नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या दुसऱ्या द्वैवार्षिक कमांडर्स परिषदेचे उद्घाटन आज वायुभवन या मुख्यालयात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले.
देशाला भारतीय हवाईदलाचा अभिमान असल्याचे सिंह यांनी यावेळी सांगितले. लष्करी सामग्रीबाबत परदेशी अवलंबित्व कमी करुन आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना देऊन आपली संरक्षण क्षमता आपण बळकट करत आहोत, असे त्यांनी सांगितले. स्वदेशी आरेखन आणि विकासासाठी आपल्याला नव्या संधींचा लाभ घ्यायला हवे, असे सांगून यासाठी भारतीय हवाई दल करत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
भविष्यातल्या आव्हानांवर मात करण्यासाठी व्यूहरचना विकसित करण्यासाठी या परिषदेचा उपयोग करावा, असे आवाहन सिंह यांनी हवाई दलाच्या कमांडर्सना केले. आज आणि उद्या ही परिषद चालणार असून, परिषदेत संयुक्त मोहिमा, ड्रोनविरोधी मोहिमा, अचूक लक्ष्यभेद, सायबर युद्ध, स्वदेशीकरण, साधनांची खरेदी, प्रशिक्षण याबाबत चर्चा होणार आहे.