मुंबई- राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळण्याच्या निर्णयामागे कुठेतरी भारतीय जनता पार्टीची साथ असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. भोंग्यांच्या त्यांच्या मुद्द्यालाही भाजपने पाठिंबा दिला आहे. तीन सभा आणि त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांची सुरू असलेली धरपकड या पार्श्वभूमीवर राज यांनी कालच मुख्यमंत्र्यांना इशारा देणारे जाहीर पत्र दिले होते. त्यानंतर आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज यांना सल्ला दिला आहे.
राज ठाकरेंनी राज्य सरकारकडून अपेक्षाच ठेवू नये. इतकी भाबडी अपेक्षा राज ठाकरे ठेवतील असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. राज्य सरकारविरोधात आम्ही लढतोय. राज ठाकरेंनी पण लढले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, जे सरकार लांगूलचालन करतंय. ज्या सरकारने इतक्या मर्यादा सोडल्यात. हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर जे राजद्रोहाचा गुन्हा लावून खासदार, आमदारांना 12 दिवस जेलमध्ये ठेवतात त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा ठेवणे पूर्ण चुकीचे आहे, अशी टीका देखील देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली होती. राज्यातील सध्याचे वातावरण पाहाता या सरकारने राज ठाकरे यांना अटक केली तर आपल्याला त्याचे आश्चर्य वाटणार नाही, अशा आशयाचे विधान त्यांनी केले होते.