भंडारा – कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जाहीर आणि जहरी टीका केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अगोदर स्वबळाचा नारा देत लक्ष वेधून घेतल्यानंतर पटोलेंनी राष्ट्रवादीवर खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे.
राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप पटोले यांनी केला. महाविकास आघाडीला बाजूला सारत भंडारा जिल्हा परिषदेवर भाजप व कॉंग्रेसने हातमिळवणी केली. कॉंग्रेस व भाजपने एकत्र येत कॉंग्रेसने परिषदेचे अध्यक्षपद तर भाजपने उपाध्यक्षपद मिळवले.
त्यावरून भुवया उंचावल्या गेल्यावर पटोलेंनी राष्ट्रवादीवरच निशाणा साधत आपल्या पक्षाच्या कृतीचे समर्थन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने अनेक ठिकाणी पाठीत खंजीर खुपसला त्यामुळे आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला,असे त्यांनी म्हटले आहे.