पुणे – “राज्यात जे काही घडलं, असं यापूर्वी कधीही घडलेलं नाही. अशा फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात 1978 मध्ये शरद पवार यांनीच केली आणि शेवटही त्यांच्याकडेच होत आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्या बंडाबाबत भाष्य केले आहे. ते पुण्यात बोलत होते.
“राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फूट हे सगळं फार आधीपासून प्लॅन केलेले असणार. या सर्व घडामोडींमध्ये संशय घ्यायला जागा आहे. जे झाले त्यात शरद पवार यांचा हात असण्याची शक्यता आहे. तसेच सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही,’ असा पुनरूच्चार राज यांनी केला. राज्यात या घडामोडी सुरू असताना उद्धव ठाकरेंशी मनसेची युतीबाबत मागणी झाली असल्याचे विचारले असता असं काही बैठकीत झालं नसल्याचा खुलासाही मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी केला.
ठाकरे म्हणाले की, “जे झालंय ते अत्यंत किळसवानं आहे. जनमताचा कौल तुम्ही घेतला तर प्रत्येक घरामध्ये शिव्या ऐकायला येतील. अशा गोष्टी अचानक घडत नाहीत. या सर्व घडामोडींमध्ये संशय घ्यायला जागा आहे. तसेच छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल ही मंडळी अजित पवार यांच्यासमवेत जातील असे वाटतच नाही.
हे सगळे संशयास्पद आहे. त्यामुळे राज्याच्या राजकरणात चुकीचा कॅरम फुटला असून, कोणत्या सोंगट्या कोणत्या ठिकाणी आहेत हेच कळत नाही. मात्र, त्याच वेळी आमचे कार्यकर्ते मात्र मनसेत आहेत हे आम्ही निश्चित सांगू शकतो’ असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.