संतोष पवार
सातारा -मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत अनेक विभागांना अधिकारीच नसल्याने प्रशासकीय कामात दिरंगाई होत आहे. अधिकाऱ्यांची अनेक रिक्त पदे कधी भरली जाणार, असा प्रश्न आहे. अनेक विभागांत “प्रभारी राज’ असून या रिक्त जागांवर तात्काळ कायमस्वरुपी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
जिल्हा परिषदेतील विविध विभागांचा कारभार खातेप्रमुखांच्या नेतृत्वाखाली चालतो. खातेप्रमुखच नसेल तर कारभारात सुसूत्रता राहत नाही. जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त असल्याने प्रशासकीय कामात व्यत्यय येत आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांची पदोन्नतीने बदली झाल्यापासून हे पद रिक्त आहे. या पदाचा अतिरिक्त कार्यभार ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
ग्रामपंचायत विभागाचा कारभार मोठा असल्याने दोन्ही विभागाचा कारभार हाताळताना अर्चना वाघमळे यांना कसरत करावी लागत आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांची कोल्हापूर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी सोलापूर येथून चंचल पाटील यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली. मात्र, चंचल पाटील यांनी काही दिवसातच अमरावती येथे बदली करुन घेतली.
त्यामुळे या रिक्त पदाचा अतिरिक्त पदभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत यांची पदोन्नतीने सिडको येथे बदली झाली असून या पदाचा अतिरिक्त कार्यभार संदीप निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांची आरोग्य उपसंचालक पदावर नियुक्ती झाल्यापासून आरोग्य विभागाचा कारभार प्रभारींवर चालला आहे. डॉ. वैशाली बडदे, डॉ. राजेश गायकवाड यांच्यानंतर डॉ. प्रमोद शिर्के सध्या आरोग्य विभागाचा कारभार चालवत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून नवीन नेमणुकांबाबत सध्या तरी शासनाची उदासीनता आहे. रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामात दिरंगाई होत असल्याने शासनाने तात्काळ अधिकारी नियुक्त करण्याची गरज आहे. साधारणत: दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अधिकाऱ्याची पदस्थापना होत असते. यावर्षी वेळेत याबाबत सरकारने निर्णय घेतल्यास रिक्त पदांचा विषय येत्या पंधरा दिवसात मिटू शकतो.