पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करण्यासाठी शनिवारी पत्रकार परिषद बोलविण्यात आली आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या धास्तीने महापालिकेच्या स्थायी समितीत शुक्रवारी नवा विक्रम नोंदविला गेला आहे. एकाच दिवशी तब्बल अडीचशेपेक्षा अधिक प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.
जवळपास ३०० कोटीं पेक्षा अधिक कामांच्या या निविदा आहेत. तर या निविदा मंजूर होताच त्याचे कार्यादेश मिळविण्यासाठी ठेकेदारांनी महापालिकेत प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून दुपारनंतर काही काळ पालिकेचे एक प्रवेशद्वार बंद ठेवण्याची वेळ आली.
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महापालिकेकडून मागील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात स्थायी समितीत प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. मात्र, महापालिकेच्या अनेक विभागांकडून आचारसंहितेचे कारण देत अनेक निविदांचे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवले. धक्कादायक म्हणजे, यातील अनेक प्रकरणांच्या निविदा तसेच प्रस्ताव तयार होते.
मात्र, त्यावर आक्षेप निघणार या भीतीने हे प्रस्ताव महत्वाचे असल्याचे दाखवित आयत्यावेळी मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहेत. तर हे प्रस्ताव घेऊन जाण्यासाठी प्रशासनास चक्क मोठ्या पिशव्या तसेच ट्राॅलीचा वापर करावा लागल्याचे पाहयला मिळाले.
रात्री उशिरापर्यंत लगबग
अनेक विभागांची कामे मिळालेले ठेकेदार स्वत: मान्यतेचे प्रस्ताव घेऊन पालिकेत फिरत होते. प्रामुख्याने मलनि:सारण, पाणीपुरवठा, पथ विभाग, भवन विभागाचे हे प्रस्ताव होते. त्यामुळे नगरसचिव कार्यालयातही रात्री उशिरापर्यंत कार्यादेश मिळविण्यासाठी ठेकेदारांची लगबग सुरू होती. आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेच्या विकासकामांच्या तसेच कार्यादेशाच्या नोंदी ताब्यात घेतल्या जात असल्याने ही धावपळ सुरू होती.