परभणी/नांदेड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसच्या शहजाद्याला (राहुल गांधी) वायनाडमध्ये संकट दिसत आहे. 26 एप्रिल रोजी वायनाडमध्ये होणाऱ्या मतदानाची शहजादे आणि त्यांचे कार्यकर्ते वाट पाहत आहेत. तेथे 26 एप्रिल रोजी मतदान झाले की, ते शहजाद्यासाठी आणखी एक सुरक्षित जागा घोषित करतील. जसे त्यांना अमेठी सोडावे लागले तसे त्यांना आता वायनाड देखील सोडावे लागेल, असा टोला त्यांनी लगाविला. ( Narendra Modi On Rahul Gandhi)
पंतप्रधान मोदी यांची शनिवारी परभणी आणि नांदेड येथे जाहीरसभा झाली. त्यात त्यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानाबाबत भाष्य करताना काँग्रेस आणि इतर विरोधकांवर टीका केली. नरेंद्र मोदी म्हणाले, 2024ची निवडणूक केवळ सरकार स्थापन करण्यासाठी होत नसून, भारताचा विकास करणे, भारताला स्वावलंबी बनवणे हे या निवडणुकीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे 2024च्या निवडणुकीचे मुद्दे हे सामान्य मुद्दे नाहीत. प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आहे, प्रत्येक पाऊल महत्त्वाचे आहे, प्रत्येक संकल्प महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेसचा हा परिवार स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा नांदेडमध्ये काँग्रेसलाच मतदान करणार नाही. कारण ते जिथे राहतात तिथे काँग्रेसचा उमेदवार नाही. ज्या कुटुंबाच्या आधारावर काँग्रेसचे कार्य चालते, ते कुटुंबच काँग्रेसला मत देऊ शकणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.
जेव्हा 2014मध्ये मी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवत होतो, तेव्हा निवडणुकीत काय चर्चा व्हायची? वर्तमानपत्रांमध्ये कोणत्या बातम्या जास्त असायच्या? टीव्हीवर कोणत्या गोष्टींवर चर्चा व्हायची? या चर्चा तेव्हा दहशतवादी हल्ल्याच्या भीतीच्या व्हायच्या. रोज बॉम्बस्फोटाच्या बातम्या येत होत्या आणि आपल्या शूर जवानांच्या हौतात्म्याच्या वेदना सहन कराव्या लागत होत्या. पण पाच वर्षांनंतर म्हणजे 2019 मध्ये सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांची चर्चा थांबली आणि सर्जिकल स्ट्राईक तसेच ‘ये तो मोदी है घर में घुसकर मारता है’ अशी चर्चा सुरू झाली, असे ते म्हणाले.