Rahul Gandhi – केंद्रात आमचे सरकार सत्तेवर आल्यावर गरीब महिलांच्या बँक खात्यात वार्षिक १ लाख रुपये आर्थिक मदत दिली जाईल आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के दिले जाईल अशी घोषणा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. महिलांना न्याय देण्यासाठी त्यांनी आज कॉंग्रेस तर्फे ज्या पाच हमी दिल्या आहेत त्यात या महत्वाच्या योजनांचा समावेश आहे.
सध्या चालू असलेल्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात महिलांच्या मेळाव्याला संबोधित करताना राहुल गांधींनी आशा, अंगणवाडी सेविका आणि माध्यान्ह भोजन योजनांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठीच्या बजेटमध्ये केंद्र सरकारचा वाटा दुप्पट करण्याचे आश्वासन दिले.
महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल शिक्षित करण्यासाठी आणि त्यांचे खटले लढवण्यासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती केली जाईल, असे ते म्हणाले. देशातील प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी सावित्रीबाई फुले वसतिगृहे उभारली जातील, असे गांधी म्हणाले.
राहुल गांधींच्या भाषणापूर्वी काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी एका व्हिडिओ निवेदनात सांगितले की, महालक्ष्मी हमी दर वर्षी गरीब महिलांच्या बँक खात्यात थेट १ लाख रुपये जमा करण्याची कल्पना आहे.
देशात महिलांचेप्रमाण ५० टक्के इतके आहे, त्यामुळे त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सरकारी नोकरीत ५० टक्के आरक्षण दिले जाणार आहे. काँग्रेसची हमी पथर की लकीर होती है , जुमला नाही, असेही खर्गे यांनी यावेळी नमूद केले.