नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा दिवस सोमवारी पहाटे मणिपूरमधील इंफाळ पश्चिम येथून पुन्हा सुरू झाला.ही यात्रा सेकमाई येथून सुरू होऊन नंतर कांगपोकपी, आणि मणिपूरमधील सेनापती येथे जाईल. यात्रा रात्री नागालँडमध्ये मुक्कामी असणार आहे. मणिपुरात सर्व शासन व्यवस्था कोलमडली असून येथील लोकांचे अश्रु पुसण्यासाठी पंतप्रधानांना वेळ मिळत नाही ही लाजीरवाणी बाब आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज एक्स वर पोस्ट केले की भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा उज्ज्वल दिवस सकाळी शिबिराच्या ठिकाणी सेवा दलाच्या पारंपारिक ध्वजारोहणाने सुरू झाला. मणिपूरचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष केशम मेघचंद्र यांनी ध्वजारोहण केले.
कॉंग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया प्रतिनिधी सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले आहे की, रोजगारी, महागाई, गरिबी, गुन्हेगारी, असुरक्षितता यावर आपले म्हणणे ऐकले जाईल आणि आम्ही एकत्रितपणे, एकजुटीने त्यावर तोडगा काढू.अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि न्यायाचा आग्रह धरण्यासाठीच या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी खासदार राहुल गांधी यांच्या यात्रेला मणिपूरच्या थौबल येथून हिरवा झेंडा दाखवला. देशातल्या ११० जिल्ह्यांतून ही यात्रा ६७ दिवसांत ६७०० किलोमीटरहून अधिक अंतर कापणार आहे. यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी राज्यातील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना मूक श्रध्दांजली वाहिली.