अहमदाबाद – लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक तंगीतून निराश झालेल्या गुजरातमधील एका कुटुंबातील पाच जणांनी विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. अशा घटना देशात वारंवार घडत असून त्यामुळे देशातील अस्वस्थता वाढीला लागली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
गुजरातमधील दाहोद शहरात ही घटना घडली आहे. सौफी दुधियावाला (वय 43) यांना मोठे कर्ज झाले होते. ते फेडण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक स्रोत नव्हता त्यामुळे त्यांनी कुटुंबासह विषप्राशन केले.
त्यात त्यांच्यासह त्यांची पत्नी मेजबील (वय 35), मुलगी अरवा (वय 16), जैनब (वय 14) आणि हुसेन (वय 7) ही दोन मुले अशा सर्वांनीच आपली जीवनयात्रा संपवली. सौफी याचे वडील मात्र हयात आहेत.
त्यांच्याकडून पोलिसांना ही माहिती मिळाली. गुरुवारी रात्री त्यांनी विष घेतले सकाळी हे सर्व जण बेशुद्धावस्थेत दिसल्याने त्यांनी पोलिसांना ही बाब कळवली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु ते मरण पावले होते.
मुलाच्या वडिलांनी आपला मुलगा व त्याचे कुटुंब आर्थिक चणचणीचा सामना करीत होते, अशी माहिती पोलिसांना दिली आहे. तथापि पोलिसांनी मात्र आम्ही सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करणार आहोत असे सांगितले.