सहकारनगर, दि. 1 (प्रतिनिधी) -“पुण्यदशम’च्या नावाखाली सुरू असलेली प्रवाशांची ससेहोलपट तत्काळ थांबवा आणि वाहतूक सेवा .किेवळ दिखाऊ आहे ती व्यवस्थित करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे उपनगर अध्यक्ष जयराज लांडगे यांनी केली आहे.
लांडगे म्हणाले की, शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी लहान बस म्हणजेच पुण्यदशमच्या बस सुरू करण्यात आल्या आहेत. शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यासारख्या रस्त्यांवर पीएमपीएलने फक्त मिनी बस द्वारे म्हणजे पुण्यदशमद्वारे सेवा देण्याचे नियोजन केले आहे. दर पाच मिनिटाला गाड्या सोडण्याचे केलेले नियोजन फसले आहे.
बस लहान असल्यामुळे गाड्या वेळेत येत नसल्यामुळे अर्धा अर्धा तास बस स्थानकावर रांगेत उभा राहूनही बसमध्ये जागा मिळत नाही, अशी अवस्था आहे. ज्या रस्त्यांवरून मोठे डंपर, बांधकामासाठीची वाहने जातात. त्या रस्त्यांवर पीएमपीएलच्या मोठ्या बस का जात नाहीत, असा प्रश्न निर्माण होतो.
मोठ्या बस सोडल्यामुळे वाहतूक कोंडी होते, याला कोणताही आधार नाही. श्रावण महिना आणि त्यानंतर येणारे विविध उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना त्रास होऊ नये, असे धोरण पीएमपीएलने आखले पाहिजे. जर शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावरील प्रवाशांना योग्य वाहतूक सुविधा मिळत नसतील तर मोठ्या गाड्या पुन्हा सोडण्याचे नियोजन केले करावे, अशी मागणी जयराज लांडगे यांनी केली आहे.
पुण्यदशम बसेसची संख्या अनेक ठिक़ाणी कमी झाली असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. परंतु, याकडे दुर्लक्ष करीत मनमाने वेळापत्रक पीएमपीकडून राबविले जात आहे.
– जयराज लांडगे
उपनगर अध्यक्ष, मनसे