पुणे – शेतकऱ्यांच्या निदर्शनापुढे या सरकारला झुकावेच लागेल, कोणत्याही अवस्थेत हे कायदे सरकारला मागेच घ्यावे लागतील. आम्ही त्या शिवाय गप्प बसणार नाही. जर सरकारने हे कायदे मागे घेतले नाहीत तर येत्या काही दिवसांत दिल्लीत बोट क्लबवर जाऊन संघर्ष करू, अशी भावना सत्येंद्रकुमार या पंजाबमधील सहारणपूर येथील शेतकऱ्याने व्यक्त केली.
प्रभातच्या ऑनलाईन आवृत्तीतील शेतकऱ्यांच्या निदर्शनाचे वृत्तांकन पाहून सत्येंद्रकुमार यांनी प्रभातशी आपल्या गावातून संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, हे सरकार फूट पाडणारे सरकार आहे. हिंदु, मुस्लीम, शिख, जाट असे विभाजन करणारे सरकार आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेला पश्चिम उत्तर प्रदेशातून भाजपला एकही जागा मिळवणे अवघड होईल, असे त्यांनी सांगितले.
गव्हाला कॉंग्रेस सरकारच्या काळात पाच हजार रूपये क्विंटल दर मिळत होता तो यंदा 1200 रूपये मिळाला. त्यामुळे शेतकरी तर आंदोलन करणारच ना? असा सवाल करून ते म्हणाले, हे सरकार या आंदोलनात खलीस्तानवादी आगेत. चीनचे हस्तक आहेत.
पाकिस्तानी लोक आहेत, असा अपप्रचार करत आहेत. शेतकऱ्यांना जात असते का? शेतकरी शेतकरी असतो. त्यात ना खलिस्तानवादी असतात. ना चीनचा काही संबंध असतो. हे आंदोलन कमजोर करण्यासाठी हा अपप्रचार सुरू आहे, असे ते म्हणाले.
फोडा आणि राज्य करा हा या सरकारचा कार्यक्रम आहे. मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनात ही नीती अयशस्वी ठरली. या आंदोलनात काही विरोधी पक्षाचे नेते सहभअगी होत आहेत. पण सरकारला मागे खेचणे हे त्यांचे कामच असते. पण विरोधी पक्षांवर आमचे आंदोलन अवलंबून नाही या आंदोलनासाठी पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, मध्य प्रदेशातून रसद शेतकऱ्यांच्या घरातून जात आहे. त्यामुळेच हे आंदोलन टीकून आहे, असे त्यांनी सांगितले.
दिल्लीच्या थंडीत टिकून राहण्यासाठी ट्रॉलीत गाद्या ठेवल्या आहेत. तंबू उभारले आहेत. थंडीचा सामना करण्यसाठी हलवा, खीर असे सकस खाद्यही आहे. त्यामुळे थंडीचा सामना करू. कोणत्याही समस्येला सामोरे जाऊ पण या उद्योजकांच्या सरकारला माघार घेण्यास भाग पाडू असे त्यांनी सांगितले.