चंदीगड – कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी थेट मोदींशीच बोलावे त्याशिवाय ही बोलणी यशस्वी होणार नाहीत अशी सूचना शिरोमणी अकाली दल आणि कॉंग्रेस नेत्यांनी शेतकऱ्यांना केली आहे.
या संबंधात बोलताना अकालीदलाच्या नेत्या व माजी केंद्रीय मंत्री हरसिमरन कौर बादल यांनी म्हटले आहे की केंद्राने शेतकऱ्यांशी चर्चेची आणखी फेरी आयोजित करून शेतकऱ्यांसमोर एक सापळा टाकला आहे त्यात शेतकऱ्यांनी अडकू नये. या चर्चेतून काही निष्पन्न होणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. शेतकरी विजयाच्या अगदी जवळ आहेत त्यामुळे त्यांनी थेट आता पंतप्रधानांशीच बोलावे असेही बादल यांनी सुचवले आहे.
पंजाब प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड यांनीही शेतकऱ्यांनी थेट मोदींशीच बोलावे असे शेतकऱ्यांना सुचवले आहे. मोदी किंवा गृहमंत्री शहा यांच्याशी चर्चा केल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. हरसिरमन कौर बादल यांनी म्हटले आहे की या कायद्यांना शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होईल असा इशारा आम्ही या आधीच केंद्र सरकारला दिला होता.
तो त्यांनी वेळीच ऐकला असता तर आज ही स्थिती इतकी हाताबाहेर गेली नसती. पंतप्रधान मोदींनीही आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, हजारो शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून आहेत त्यामुळे त्यांचे हे आंदोलन आता त्यांनी लांबवू नये असे आवाहनही त्यांनी सरकारला केले आहे.