आंबेगाव बुद्रुक (संतोष कचरे), दि. 4 – दक्षिण पुण्यात 30 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला राजमाता भुयारी मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण येत असून दररोज कोंडी होत आहे. मात्र, विकास आराखडा आखणाऱ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे.
अवजड वाहनांना बंदी असतानाही नुकतीच सिमेंट मिक्सर गाडी या पुलाखाली अडकली. त्यामुळे अनेक वेळ नागरिक वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. कात्रज चौक, दत्तनगर चौक, भारती विद्यापीठ, त्रिमूर्ती चौक, राजमाता भुयारी मार्ग, कात्रज उद्यान चौक अशा अनेक ठिकाणी होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे दक्षिण पुण्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, दत्तनगर चौकातील सिग्नल अनेक दिवसापासून बंद आहेत. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत.
वाहतूक पोलीस आडोश्याला
दत्तनगर जांभुळवाडी रोडवर अवजड वाहनांना बंदी असूनही ट्रक, हायवा, पाण्याचे टॅंकर याबरोबर अनेक अवजड वाहनांची वाहतूक होत असते. पोलीस मात्र वाहतूक कोंडीच्या ठिकाणी न थांबता आडोश्याला “सावज’ शोधताना दिसतात, अशी अनेक नागरिक तक्रार करत आहेत.
रुग्ण-नातेवाईक आणि विद्यार्थ्यांना त्रास
राजमाता भुयारी मार्गापासून पुढे नीलायम थिएटरपर्यंत पर्यायी रस्ता असल्याने नागरिक त्याचा वापर करतात. परंतु दररोज सकाळी व संध्याकाळी नागरिकांना या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याचा फटका भारती विद्यापीठ हॉस्पिटल येथे येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक, तसेच भारती विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसत आहे.