पुणे – महापालिकेची आगामी निवडणूक वेळेत होणार की पुढे ढकलणार, अशी चर्चा सुरू असली तरी राजकीय पक्षांनी निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. महापालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असली तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कॉंग्रेस आणि शिवसेनेचीही साथ राष्ट्रवादीला मिळाली. यामुळेच भक्कम विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने भूमिका निभावत भाजपाला नेहमीच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर, भाजपानेही राष्ट्रवादीला सर्व पातळीवर शह देत सत्ताधारी पक्षाची ताकद दाखवून दिली.
याच कारणातून राष्ट्रवादी कॉंग्रेसला कुठल्याही स्थितीत आता महापालिकेची सत्ता हवी आहे. यातून भाजपला रोखण्यासाठी कॉंग्रेस आणि शिवसेनेला बरोबर घेऊन महापालिकेत राजकीय खेळी करताना एकत्र लढणार की स्वतंत्र.., या प्रश्नावर महाविकास आघाडीतील पक्षांचे नेते वरिष्ठ नेते निर्णय घेतील, एवढेच मोघम उत्तर देत आहेत. तर, भाजपाला गाफिल ठेवण्यासाठी ही राजकीय खेळी असल्याची चर्चा आहे.
महापालिकेवर भाजपची सत्ता आहे तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. करोना काळात गेल्या दोन वर्षांत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून वेगवेगळ्या मुद्यावर भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, त्यात शंभर टक्के यश आले असे म्हणता येणार नाही. करोना काळातील स्थिती सर्वांनाच माहित आहे. आर्थिक अडचणीतून निधी खर्च आला नाही हे उघड आहे. याच कारणातून शहरातील विकासकामे रेंगाळले, रस्त्यावर टाकण्यासाठी डांबरही उपलब्ध होत नव्हते, अशा स्थितीतूनही महापालिकेला मिळणारा मिळकत कर वसुलीसाठी भाजपने विविध योजना राबविल्या. योग्य नियोजन आणि प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्यातून भाजपने काम करीत राष्ट्रवादीला कोणतीही संधी दिली नसल्याची स्थिती पहायला मिळाली. तर, त्यानंतरच्या काळात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूूमीवर उपलब्ध निधी अधिकाधिक खर्च करण्यावरच सर्वच पक्षांच्या नगरसेवकांकडून भर दिला गेला. यात राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्य नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील कामे उरकून घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांनी आपले वर्चस्व त्या-त्या प्रभागात दाखवून दिले. त्यातच उपनगरांतील वाढीव मिळकत कर तसेच त्याप्रमाणात त्या गावांत सुविधा उपलब्ध करून देण्यात पालिका अपयशी ठरल्याच्या मुद्यावरून नागरिकांत असलेला रोष कोणत्याही पक्षाला परवडणारा नाही. याशिवाय या गावांचा विकास आराखडा तसेच विकासाकामांसाठी लागणारा वाढीव निधी, असे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. यातून सत्ताधारी भाजपला घेरण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष करू शकतो. साहजीकच यासाठी कॉंग्रेस आणि शिवसेनेचीही मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. परंतु, यासाठी निवडणूक एकत्र की स्वतंत्र, हा मुद्दा महत्त्वाचा असून भाजपनेही याबाबत अंदाज घेत जोरदार तयारी केली आहे.
शिवसेनेलाही आत्मविश्वास…
2017च्या महापालिका निवडणुकीनंतर भाजपला मिळालेल्या यशामुळे भाजपाचा विश्वास दुणावला आहे. मात्र, राष्ट्रवादी मागे पडली असल्याचे विधानही सरसकटपणे कोणी थेट मान्य करणार नाही. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपाला अनेक ठिकाणी शह दिला, त्यांचे बहुतांशी ठिकाणचे उमेदवार कमी मतांनी पराभूत झाले होते, त्यामुळे यावेळीही भाजपापुढे राष्ट्रवादीचेच आव्हान असणार आहे. तसेच, राज्यात सत्ता असल्याने शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. आरपीआय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमदेवारही शहर, उपनगरांत आव्हान निर्माण करू शकतील.