पुणे – लॉ कॉलेज रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी महापालिका सरसावली आहे. पौड रस्त्यावरून थेट सेनापती बापट रस्त्यावरील बालभारतीपर्यंतचा रस्ता विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला आहे. या विषयावरून पुण्यात गेल्या काही दिवसांत बराच गदारोळ सुरू आहे. पर्यावरणवाद्यांनी या रस्त्याला आक्षेप घेतला आहे. फक्त 15 टक्केच वाहने जाणार आहेत, वृक्षांची तोडणी होणार आहे, यामुळे विरोध होत आहे. प्रस्तावित रस्त्याला आक्षेप घेणाऱ्यांनी लॉ कॉलेज रस्त्यावरील वाहतूक कोंडी, तेथील रहिवासी आणि रोज कोंडीचा सामना करावा लागणारे वाहनचालक, तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या कोडींमुळे निर्माण झालेली प्रदूषणाची गंभीर समस्या यांचा विचार केला आहे का, हा प्रश्न आहे.
क्षिणोत्तर असलेल्या लॉ कॉलेज रोडच्या दक्षिणेला कर्वे रस्ता तर उत्तरेकडे सेनापती बापट रस्ता आहे. दक्षिणेकडील एरंडवणे, पौड रोड, कोथरूड, वारजे येथील नागरिक उत्तर भागातील सेनापती बापट रोड, पुणे विद्यापीठ, बाणेर, पाषाण, औंध, पीसीएमसी परिसरात ये-जा करण्यासाठी लॉ कॉलेज रोड वापरतात. अनेकदा त्यांना लॉ कॉलेज रोडवर काही काम नसूनही या रस्त्याचा वापर करूनच इप्सित स्थळी जावे लागते.
त्यातच कर्वे रोड आणि सेनापती बापट रोड हे सहा पदरी (दुहेरी) रस्ते आहेत. पण लॉ कॉलेज रोड काही ठिकाणी चार पदरी (दुहेरी) आहे, तर काही ठिकाणी तो दोन पदरी आहे. संपूर्ण लॉ कॉलेज रस्त्यावर 3 सिग्नल असून 10 गल्ल्या, 3 प्रमुख रस्ते (भांडारकर रोड, प्रभात रोड, आणि एसएनडीटी कालवा रस्ता) त्याला छेदतात.
आठवले चौक आणि प्रभात रस्त्याचा सिग्नल येथे लॉ कॉलेज रस्ता दोन लेनचा असल्याने एकदम अरुंद होऊन बॉटलनेक स्थिती तयार होते. 8 गल्ल्या या बॉटलनेक रस्त्याला छेदतात. या सगळ्यामुळे या परिसरात वाहनांची खूपच कोंडी होते. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अवघड जाते. लेनमधील वाहनांना लॉ कॉलेज रोडवर येताना अथवा लॉ कॉलेज रोडवरील वाहनांना कुठल्याही लेनमध्ये वळताना अडचण येते. वाहतुकीसंबंधी एका अहवालानुसार लॉ कॉलेज रस्ता हा चार पदरी आहे, असे दाखविण्यात आले आहे. पण प्रत्यक्षात हा रस्ता काही ठिकाणी दोन पदरी आहे, याची दखल घेतली नाही.
नवा प्रस्तावित रस्ता सहा लेनचा म्हणजे सहा पदरी असून, त्यावर मध्यभागी कोठेही सिग्नल अथवा रस्त्याला छेदणारे रस्ते नसतील. त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि वाहनांचे इंधन वाचणार आहे.
किती टक्के वाहतूक नवीन बायपासवर?
2023 मध्ये केलेल्या ताज्या सर्वेक्षणानुसार, लॉ कॉलेज रोडवरील नवीन बायपासवर शिफ्ट होणारी वाहन संख्या 66% आहे. ही एक लक्षणीय संख्या आहे. 66% वाहने बायपासवर शिफ्ट झाल्यामुळे लॉ कॉलेज रोडवरील उरलेल्या 34 टक्के वाहनांना गाडी चालविण्यासाठी अधिक मोकळी जागा मिळणार आहे. त्यामुळे त्यांची वाहतूक कोंडी आणि प्रदूषणातून सुटका होईल. लॉ कॉलेजवर राहिलेल्या वाहतुकीलादेखील नव्या प्रस्तावित रस्त्यामुळे फायदा होणार आहे, हा मुद्दा कोणीच विचारात घेतला नाही. म्हणजे तसे बघितले तर नवीन बायपासमुळे जवळ जवळ सर्वच वाहनांना (बायपासवर शिफ्ट झालेली वाहने आणि लॉ कॉलेज रस्त्यावर आता राहिलेली वाहने) फायदा होणार आहे.
एसएनडीटीकडून येणाऱ्या वाहनांना लॉ कॉलेज रोडवरून प्रभात रोड किंवा भांडारकर रोडला वळता येत नाही. त्यामुळे असे लोक आठवले चौकात लॉ कॉलेज रोडवर न वळता सरळ कॅनॉल रोडचा वापर करतात आणि इच्छित स्थळी जातात. त्यामुळे एसएनडीटीकडून आलेले आठवले चौकाकडून जर्मन बेकरीकडे जाणारे जास्तीत जास्त लोक नव्या बायपासचाच वापर करतील. त्यामुळे बायपासवर शिफ्ट होण्याची टक्केवारी अधिक असणार आहे.
नवीन बायपासमुळे नळ स्टॉप चौकातून उजवीकडे पौड रस्त्याकडे वळणाऱ्या वाहनांची संख्या कमी होणार आहे. त्यामुळे नळ स्टॉप उड्डाणपुलाच्या खाली वाहतूक कोंडी कमी होईल तसेच पौड भागातून बीएमसीसी रोडवर जाणारे आणि त्या उलट प्रवास करणारेदेखील नवा बायपास रोड वापरू शकतात. तसेच सेनापती बापट रस्त्यावरून येणाऱ्यांना बायपास वापरून पौड रस्त्यावर डावीकडे वळण घेऊन कर्वे रस्ता, म्हात्रे पूल भागातदेखील जाता येईल.
हा बायपास सहा पदरी असल्याने, त्यावर कुठेही सिग्नल नसल्याने आणि एकही छेदरस्ता नसल्याने नागरिक नव्या रस्त्यालाच प्राधान्य देतील, यात कोणतीही शंका नाही. तसेच सहा लेन्स असल्यामुळे या रस्त्यावरून जास्ती पीएमपीएमएलच्या बसेस सोडता येऊ शकतील. लॉ कॉलेज रस्ता काही ठिकाणी फक्त दुपदरी (बॉटलनेकचा भाग) असल्यामुळे तेथून बसची संख्या वाढवायला पीक अवर्समध्ये अर्थात घाईगडबडीच्या वेळी मर्यादा येतात.
15 टक्के आकडा आला कुठून?
काही लोकांचा असा समज आहे की, 2019 मधील वाहतूक सर्वेक्षणानुसार 1.16 लाख वाहने ही लॉ कॉलेज रोडवर (जर्मन बेकरी) येथे आहेत. 34,301 वाहने लॉ कॉलेज रोडवर (आठवले चौकाच्या अलीकडे) आहेत. 34,301 मधील निम्मी 17 हजार वाहने नवीन बायपास रोडवरून जातील असे त्या लोकांचे म्हणणे आहे. म्हणून त्यांनी 1.16 लाखावर 17 हजार याप्रमाणे तर 100 वर 15 टक्के वाहने नवीन रस्त्यावर शिफ्ट होतील असे म्हटले आहे. परंतू लॉ कॉलेज रस्ता (जर्मन बेकरी) येथे 2019 च्या वाहतूक सर्वेक्षणानुसार खरी संख्या ही 1.16 लाख नसून 46,891 वाहने अशी आहे. त्यामुळे 1.16 लाख हा चुकीचा आकडा धरून काढलेला 15 टक्के आकडा हा चुकीचा ठरतो.
2019 च्या ओरिजीन अँड डेस्टिनेशन सर्वेनुसार लॉ कॉलेज रोडवरील 57 टक्के वाहने ही नवीन बायपास रोडवर शिफ्ट होणार आहेत म्हणजेच त्या रस्त्याचा वापर करतील.
पर्यावरण संरक्षण…
वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांमुळे होणारा ऑक्सिजनचा वापर कमी करण्यावर नवीन रस्त्याचा उपयोग होणार आहे. रस्त्यासाठी टेकडीचा केवळ 0.344 टक्केच वापर होणार असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. या प्रकल्पादरम्यान सुमारे 1416 झाडे तोडण्यात येणार आहेत. त्यापैकी 600 झाडे भारतीय भूमीतली नाहीत. तोडलेल्या झाडांपैकी महापालिका काही झाडांचे पुनर्रोपण करणार आहे.
जेव्हा वाहने ट्रॅफिकमध्ये अडकतात, तेव्हा इंजिन मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वापरत असते. तीस मीटरचे एक झाड दररोज सुमारे 240 लिटर ऑक्सिजन तयार करते. एक 1000 सीसी इंजिनची कार, 1000 आरपीएमला थांबलेली असताना एका मिनिटात 200-240 लिटर ऑक्सिजन वापरते. त्यामुळे प्रत्यक्षात 1416 झाडे जरी कापली जाणार असली, तरी त्यांच्यामुळे तयार होणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा बराच जास्त ऑक्सिजन सध्या लॉ कॉलेज रोडवरील वाहतूक कोंडीमधील वाहनांमुळे नाहीसा होतो आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणाची संकल्पना नीट समजून घेणे गरजेचे आहे. पर्यावरण संरक्षण म्हणजे हवेतील एकूण ऑक्सिजनचे प्रमाण वाढवणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे असा आहे. झाडे कापून नवीन रस्ता केल्यामुळे लॉ कॉलेजवरील वाहतूक कोंडी कमी झाल्याने हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास आणि हवेची गुणवत्ता राखण्यास मदतच होणार आहे.
झाडे तोडणे हा नेहमीच हानिकारक किंवा वाईट पर्याय नसतो. पीएमसी रस्ता करण्यासाठी झाडे तोडत आहे, ज्याचा पर्यायाने लाभ नागरिकांनाच होणार आहे. सरकारी नियमानुसार एक झाड तोडले की 5 ते 10 झाडे लावावी लागतात. पीएमसीने दहा किंवा त्याहून अधिक वृक्षारोपण करून त्यांची देखभाल करण्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. महापालिकेकडून पुणे शहर आणि आजूबाजूला अधिक हिरवे क्षेत्र कसे विकसित होईल आणि हनुमान आणि वेताळ टेकडीसारखी आणखी फुफ्फुसे कशी निर्माण होतील, हे बघितले पाहिजे. दहापट झाडे लावल्यामुळे काही वर्षांनी काही पट अधिक ऑक्सिजन मिळणार आहे, हे लक्षात घ्यावे.
प्रस्तावित रस्त्यावरील केळेवाडी झोपडपट्टीच्या परिसरात झाडे विरळ आहेत. पुढे हनुमान टेकडीच्या डोंगर उताराच्या खालच्या भागातून हा रस्ता जातो, जिथे लागूनच निवासी इमारती, विधी महाविद्यालय आणि भांडारकर संस्था आहेत. तसेच या भागात झोपडपट्टीतील काम करणाऱ्या आणि टेकडीवर फिरायला येणाऱ्यांची वर्दळ असते. त्यामुळे त्या भागात पशुपक्ष्यांची (ऋर्रीपर) हालचाल कमी असते. या भागातील 1416 झाडे तोडण्यात येणार आहेत. टेकडी क्षेत्रापैकी केवळ 0.344 % भागच या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार. याचा अर्थ टेकडीचा 99.656 % उर्वरित भाग, ज्यामध्ये टेकडीचा माथा, टेकडीच्या पश्चिम, दक्षिण आणि उत्तर बाजूच्या उताराचा वापर होणार नाही. त्यामुळे तेथील पशुपक्षी (ऋर्रीपर) आणि जैवविविधता (इळेवर्ळींशीीळीूं) यावर विपरित परिणाम होणार नाही. येथे ध्वनी प्रदूषण होत नाही ना, याची खात्री करण्यासाठी संपूर्ण प्रस्तावित रस्ता हा “नो हॉकिंग झोन’ करावा. शिवाय नियोजित रस्ता एलिव्हेटेड होणार असल्याने लॉ कॉलेज रोडवरून टेकडीवर जाण्यासाठी लोक प्रस्तावित रस्त्याच्या खाली फिरू शकतील.
प्रदूषणाचे दुष्परिणाम
लॉ कॉलेज रोडवरील वाहतूक कोंडीमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण गंभीर पातळीला जाते. वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, हृदयाचे आजार, चिडचिड होणे, डोकेदुखी, थकवा, फुफ्फुसाचा कर्करोग इ. आजार होण्याची शक्यता असते. विशेषत: लहान मुले आणि वृद्धांना या आजारांची लागण होण्याची अधिक शक्यता असते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, दरवर्षी 24 लाख लोकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू होतो. ध्वनी प्रदूषणामुळे श्रवणशक्ती कमी होते, रक्तदाब, झोपेचा त्रास, तणाव, एकाग्रता कमी होऊ शकते. बरेच विद्यार्थी लॉ कॉलेज रोड वापरतात, हे विसरून चालणार नाही. लॉ कॉलेज रोडच्या दोन्ही टोकांजवळ अनेक शैक्षणिक संस्था आहेत आणि त्यांना हाच रस्ता वापरणे क्रमप्राप्त आहे. सिम्बायोसिस, बीएमसीसी, मराठवाडा कॉलेज, विखे-पाटील, विद्याभवन शाळा, अभिनव, कर्नाटक हायस्कूल, एमआयटी कॉलेज यासाठी लॉ कॉलेज रोडच मुख्य साधन आहे. त्यामुळे नवीन बायपास रस्त्यामुळे लॉ कॉलेज रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होईल, वाहतूक कोंडीही होणार नाही आणि पर्यायाने प्रदूषण घटणार आहे. शिवाय प्रवासाचा वेळ वाचून इंधन वापर कमी होणार आहे.
पुणे महापालिकेच्या म्हणण्यानुसार रस्त्यासाठी खांब उभारण्यासाठीच फक्त जमीन खोदली जाणार आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या क्षेत्रांचा नाश प्रभावीपणे टाळला जाईल. नवीन रस्ता, सेनापती बापट रस्ता आणि पौड रस्ता सहा लेन्सचे असल्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही.
पुणे शहराची सध्याची अंदाजे लोकसंख्या जवळपास 44 लाख आहे. पुणे महानगर प्रदेश सुमारे 80 लाख लोकसंख्येचा आहे. वर्ष 2022-23 मध्ये पुण्यात नोंदणीकृत वाहनांची संख्या सुमारे 2.7 लाखाने वाढली आहे. दरवर्षी नव्याने जोडलेल्या वाहनांची संख्या गेल्या वर्षीइतकीच असेल तर वाहनांची प्रचंड संख्या हाताळणे रस्त्यांना अशक्य होईल. वाढती वाहने आणि विकास प्रकल्प अधिक कार्यक्षम बनवण्याबरोबरच आपल्याला पर्यायी रस्ते तयार करावेच लागतील. अधिक मेट्रोमार्ग तयार करावे लागतील, पीएमटी सेवा अजून सक्षम करावी लागेल. त्यामुळे हा प्रस्तावित रस्ता हा लक्झरी नसून गरजेचा आहे, यावर शिक्कामोर्तब व्हायला हवे. लोकप्रतिनिधी, पर्यावरणवादी आणि सर्वसामान्य नागरिक या सगळ्यांनी संतुलित भूमिका स्वीकारण्याची आणि सुवर्णमध्य साधण्याची गरज आहे.
(लेखक लॉ कॉलेज रस्ता परिसरातील जागरूक नागरिक आहेत.)