पुणे – महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापवण्यासाठी पुण्यात स्थानिक मुद्दे सोडून भलत्याच विषयांवर आंदोलने-निदर्शने करण्याची स्टंटबाजी सुरू झाल्याचे चित्र आहे. यात कोणताही राजकीय पक्ष पिछाडीवर नाही, हेच यातील शक्तिस्थान, असल्याची चर्चा नागरिकांत आहे.
पुणे महापालिका निवडणूक कधी होईल, याची चर्चा स्थानिक नेते-पदाधिकाऱ्यांत जोरात आहे. प्रभाग रचना पाहिली, तर बऱ्याच ठिकाणी मोडतोड तर काही ठिकाणी “जुगाड’ जमवण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांश इच्छुकांची चलबिचल सुरू आहे. स्थानिक पातळीवरील मुद्दे घेऊन हे “भावी नगरसेवक’ जोरदार तयारी करत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला सर्वच राजकीय पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी भलत्याच विषयांवर आंदोलन करत आहेत. यात पुणेकरांच्या पदरी काय पडणार, याचा विचार फारसा होताना दिसत नाही. विशेषत: राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप आणि कॉंग्रेस यांच्यातच आंदोलने-घोषणाबाजी आणि निदर्शनांची जुगलबंदी रंगली आहे. मागील काही दिवसांत सातत्याने होत असलेल्या आंदोलनांचे विषय पाहिले, तर त्याचा पुण्याशी किंवा पुणेकरांशी फारसा संबंध नसल्याचे दिसून येते.
राज्य आणि देश पातळीवर सध्या बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या किंवा घडत आहेत. त्यात प्रामुख्याने भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यावरील टीका आणि कारवाई हे पुण्यातील आंदोलनांचे मुद्दे आहेत. तर, पुणे महापालिका निवडणूक पाहता, या आंदोलनांनी पुणेकरांचे काय साध्य होणार? असा “बेसिक’ प्रश्न आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांचे काही कार्यकर्ते सोडले, तर सामान्य पुणेकरांना या आंदोलनांत काडीचाही “रस’ नाही, अशाच सामान्यांच्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे वरिष्ठांची शाबासकी मिळवण्यासाठी किंवा फक्त फोटोसेशन करण्यासाठीच ही आंदोलने केली जात आहेत का? या प्रश्नांची उत्तरे पुणेकरांना हवी आहेत.
शहरातील प्रश्नांकडे कोणाचे लक्ष आहे?
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर येथील राजकीय नेत्यांनी स्थानिक विषयांवर बोलणे अपेक्षित आहे. त्यात कचरा निर्मूलन, वाहतुकीची समस्या, पादचारी मार्गांची दुर्दशा, जिकडे-तिकडे खोदलेले रस्ते, वाढते प्रदूषण रोखणे, प्रभागनिहाय आवश्यक मूलभूत सुविधा अशा विषयांवर कोणीही बोलण्यास तयार नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा कळीचा मुद्दा असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता “फोटोसेशन’साठी झगडणाऱ्या या स्टंटबाजांचे पुणेकरांना काही कौतुक उरलेले नाही, अशीच प्रतिक्रिया उमटत आहे.