पुणे – महापालिकेकडून लष्कर जलकेंद्रातून बंद जलवाहिनीद्वारे मांजरी गावाला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. परिणामी, महापालिकेचा तब्बल दोन टीएमसी पाण्यावरील खर्च तसेच जलसंपदा विभागाचे दोन टीएमसी पाणीही वाचणार आहे. यासाठी लष्कर जलकेंद्रातून मांजरी गावासाठी पाणी उचलल्या जाणाऱ्या मुठा-उजव्या कालव्याच्या जॅकवेलपर्यंत जलवाहिनी टाकण्यात येत असून पुढील महिनाभरात हे काम पूर्ण होणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.
मांजरी गावाला पाणी पुरवठ्यासाठी दिवसाला 20 एमएलडी पाण्याचीच आवश्यकता आहे. मात्र, यासाठी कालव्यातून प्रतिदिन तब्बल 172 एमएलडी पाणी सोडावे लागते. त्यामुळे, या योजनेसाठी कालव्याऐवजी जलवाहिनी टाकून थेट मांजरीसाठी पाणी देण्यात येणार आहे
…तर वाचणार दीड टीएमसी पाणी
मांजरीसाठी पाणी द्यायचे असल्यास पाटबंधारे विभागास वर्षाला पाव टीएमसी पाणी देण्यासाठी तब्बल दीड टीएमसी जादा पाणी सोडावे लागते. या जादा पाण्याचे पैसे महापालिकेकडून वसूल केले जातात. त्यामुळे, महापालिकेवरही मोठा आर्थिक भार पडतो. ही बाब लक्षात घेऊन मांजरी पाणी योजनेला कालव्याऐवजी महापालिका थेट लष्कर जलकेंद्रातून दररोज 20 एमएलडी पाणी देणार आहे. त्यामुळे रोजचे कालव्यात सोडावे लागणारे 152 एमएलडी अतिरिक्त पाणी सोडावे लागणार नाही.
तसेच या पाण्याची बचत होण्यासह महापालिकेच्या पाणीवापरात लागणारे जादा पाणीही कमी होणार आहे. दरम्यान, हे काम तातडीने करण्यात येत आहे. ते पूर्ण होताच पाटबंधारे विभागास पत्र पाठवून महापालिकेच्या पाणीवापरात दाखविण्यात येणारे अतिरिक्त पाणी कमी करण्याचे पत्र दिले जाणार आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची बचत होण्यासह महापालिकेवरील बीलाचा भारही कमी होणार आहे, असे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.