पुणे – महापालिकेडून वडगाव बुद्रुक येथे १२५ एमएलडी क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी २१९ कोटी १३ लाख रुपयांच्या खर्चाच्या पूर्वगणनपत्रकास अंदाज समितीने मान्यता दिली असून ५० टक्के निधी हा केंद्र सरकारच्या अमृत-२ योजने अंतर्गत राज्य शासनास पाठविण्यात आला आहे. मात्र, राज्य शासनाने या प्रकल्पाच्या खर्चावर आक्षेप घेतला असल्याने हा प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता आहे.
महापालिकेने या पूर्वी शासनाच्या विशेष प्रकल्पा अंतर्गत या प्रकल्पाचा सुमारे १४२ कोटींचा आराखडा सादर केला होता. तर, आता नव्याने पाठविलेल्या प्रकल्प सुमारे १९६ कोटींचा आहे. त्यामुळे, प्रकल्पाच्या खर्चात अचानकवाढ कशी झाली, असा आक्षेप शासनाकडून घेण्यात आला आहे. शहराची वाढत्या लोकसंख्येनुसार २०३२ व २०४७ मधील पाण्याच्या मागणीचा अंदाज घेत जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढविणे गरजेचे असल्याने नवा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
सध्याच्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता २५० एमएलडी आहे, २०३२ मध्ये ही क्षमता २७७ एमएलडी प्रस्तावित आहे, तर समाविष्ट झालेल्या गावांमुळे १११.२१ एमएलडी पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे ३८८ एमएलडी पाण्याची मागणी आहे. यानुसार २०३२ पर्यंत विचार करता १२५ एमएलडी क्षमतेचा प्रकल्प वडगाव बुद्रुक येथे उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या कामासाठी एकूण खर्च २१९ कोटी १३ लाख रुपये अपेक्षित आहे. अमृत-२ योजनेअंतर्गत केंद्र शासन व राज्य शासनाकडून ५० टक्के निधी उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात ५० कोटी रुपये तरतूद उपलब्ध आहे.
मोठ्या प्रमाणावर कामे करावी लागणार
महापालिका प्रशासनाच्या मते या प्रकल्पाची जागा ताब्यात असली तरी त्याचा काही भाग डोंगरालगत आहे. तर काही भाग समतल नाही. त्यामुळे महापालिकेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिमाभिंत तसेच काॅंक्रीटीकरणाची कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झालेली आहे. त्यानुसार, शासनास सुधारीत अहवाल देताना जुन्या आणि नवीन प्रकल्पातील बदलांची माहिती दिली जाणार असून त्यासाठी प्रकल्पाचा आराखडा तयार करणार्या सल्लागार कंपनीस सूचना देण्यात आल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून सांगण्यात आले.