पुणे – लग्नानंतर सुखी संसार फुलविण्याचे स्वप्न रंगविणारी दाम्पत्य आयुष्यात कुठल्यातरी वळणावर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात. त्यांच्यामधील प्रेमभावना लुप्त होऊन वाद इतके विकोपाला जातात की अगदी काडीमोड घेण्यापर्यंत परिस्थिती येते. परस्पर संमतीच्या प्रकरणात लग्नाच्या गाठी सहज सुटतातही. मात्र, एकतर्फी प्रकरणात पोटगी, गुन्हा यापर्यंत पती-पत्नीची मजल जाते.
अन् त्यानंतर सुरू झालेल्या कौटुंबिक युध्दात पोटच्या चिमुकल्यांचीच ढाल बनवून समोरच्यांवर मात देण्याचा प्रयत्न पती व पत्नींकडूनही सुरू होत असल्याचे धक्कादायक चित्र कौटुंबिक न्यायालयातील प्रकरणांवरून दिसून येते. आयुष्याच्या साथीदाराकडून अवास्तव अपेक्षा, कुटुंबातील अन्य सदस्य अडसर वाटू लागणे, संशयाचे भूत मानगुटीवर नाचू लागणे किंवा एकमेकांबद्दल पराकोटीचे गैरसमज यातून संसारवेल कोमेजण्यास सुरुवात होते. शतजन्मीचे नाते जपण्याच्या आणाभाका घेणारी दाम्पत्य एकमेकांकडे न पाहणेच पसंत करतात.
परस्पर संमतीच्या प्रकरणात लग्नाच्या गाठी सहज सुटतातही. मात्र, बहुतांश एकतर्फी प्रकरणात पत्नीकडून पतीकडे पोटगी मागितली जाते. याखेरीज, पतीसह त्याच्यासह कुटुंबियांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात येतात. यावेळी, कुटुंबीय नातेवाइकांमध्ये रस्सीखेच सुरू होऊन अपत्याचा हत्यार म्हणून वापर होण्यास सुरुवात होते.
न्यायालयात दाखल झालेल्या बहुतांश प्रकरणांमध्ये पोटगीसह गुन्हे टाळण्यासाठी पतीकडून पत्नीकडे मुलांचा ताबा मागण्यात येतो. तर, नवर्याचे तोंडही न पाहण्याचा निर्धार केलेल्या पत्नींकडून मुलांशी संबंध तसेच त्यांना न भेटण्याची अट ठेवण्यात येते. याखेरीज, पोटगी देत असतानाही मुलांची भेट घेण्यासाठी आले असता वाद घालणे, मुलाची शाळा आहे, मुलगी आजारी आहे, अशी कारणे सांगून बापलेकाची भेट टाळण्याकडेही पत्नीचा कल राहत असल्याचे निरीक्षण वकीलवर्गांकडून नोंदविण्यात येत आहे.
“पत्नी-पत्नी दोघेही मुलांचा वापर कौटुंबिक प्रकरणात ढाल म्हणून करताना दिसून येतात. पत्नी पोटगी मिळविण्यासाठी वापर करते. तर, पतीकडूनही मुलाचा वापर केला जातो. मुलांना प्रेम देण्यापेक्षा दोघांना स्वत:चा अहंकार महत्त्वाचा असतो.” – अॅड. आकाश मुसळे, माजी कार्यकारिणी सदस्य, पुणे बार असोसिएशन