पुणे, दि. 30 – भाडेवाढीनंतर रिक्षाचालकांना मीटर कॅलिब्रेशनसाठी सोमवार (दि.31 नोव्हेंबर) अंतिम दिवस आहे. दि. 1 नोव्हेंबरपासून मीटर कॅलिब्रेशन न केलेल्या रिक्षावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे यापूर्वीच आरटीओकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुदतवाढ मिळणार, की कारवाई होणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सीएनजी सातत्याने महागत असल्याने रिक्षा भाडेवाढीची मागणी केली जात होती. यासाठी संघटनांकडून वेळोवेळी आंदोलन करण्यात आले होते. शेवटी राज्य प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) रिक्षा भाडेवाढीला दि. 1 ऑगस्ट रोजी मंजुरी दिली होती.
ही भाडेवाढ आकारण्यासाठी रिक्षा चालकांना मीटर कॅलिब्रेशन बंधनकारक होते. कॅलिब्रेशनसाठी अलंगार पोलीस ठाण्यासमोर कर्वेनगर, फुलेनगर आळंदी रस्ता चाचणी मैदाण, रामटेकडी इंडस्ट्रिअल इस्टेट इगलबर्ग कंपनी, दिवे (पासिंग वाहने) आणि इयॉन आयटी पार्क खराडी ही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. पण, शहरात एक लाखाच्या आसपास रिक्षा असल्याने आणि कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्याने रिक्षा चालकांना बारकोड असलेले टेरिफ कार्ड वापरण्यास परवानगी दिली होती. टेरीफ कार्ड वापरास परवानगी दिल्यानंतर मीटर कॅलिब्रेशनचे प्रमाण घटले होते. आता सोमवारी अंतिम मुदत आहे.
असा लागू शकतो दंड
मुदत समाप्तीनंतर प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी रिक्षा चालकाचा परवाना एक दिवस निलंबित करण्यात येईल. निलंबन कालावधी किमान सात दिवस तर कसाल 40 दिवस राहील. निलंबनाऐवजी तडजोड शुक्ल भरण्याची तयारी असल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी 50 रुपयांप्रमाणे किमान 500 रूपये तर कमाल दोन हजार रुपयांपेक्षा अधिक दंडाची तरतूद आहे.