पुणे,मुंढवा – केशवनगर- मुंढवा जॅकवेल बंधा-याजवळ असलेल्या मुळा-मुठा नदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात साठली आहे. या वाढलेल्या जलपर्णींमुळे या परिसरात डास, मच्छर,कीटक आणि माश्यांचे प्रमाण वाढले आहे. या वाहणा-या मुळा-मुठा नदीलगतच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आता या परिसरात डासांचे तुफान आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिक एवढी मागणी करीत असताना देखील महानगरपालिका प्रशासन यावर काहीच उपाययोजना करताना दिसत नाही. महानगरपालिकेने त्वरीत ही जलपर्णी काढावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
मुंढवा-केशवनगर मध्ये काही वर्षापूर्वी महानगरपालिकेने जॅकवेल प्रकल्प या ठिकाणी सुरु केला. या जॅकवेल प्रकल्पामुळे येथील बंधा-याजवळ पाणी साचून राहिल्याने नदीतून फेसाळलेले पाणी कायमच पाहायला मिळते. अशातच येथे संपूर्ण नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साठली आहे. या वाढलेल्या जलपर्णीमुळे ठिकठिकाणी डासांची पैदास होत आहे. त्यामुळे नदीपात्राजवळ राहणा-या नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना या डांसामुळे प्रचंड त्रास होत आहे. विविध आजार जडत आहेत. तरी ही जलपर्णी काढून टाकावी. अशी मागणी जोर धरीत आहे.
केशवनगर येथील नदीपात्रातील वाढलेल्या जलपर्णीमुळे अनेक नागरिकांना डेंगी,मलेरिया, ताप अशा आजारांना तोंड द्यावे लागत आहे. डासांची उत्पत्ती कमी करण्यासाठी वेळोवेळी औषध फवारणी करण्यात यावी. केशवनगरमध्ये महानगरपालिकेने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. येथील वाढलेली जलपर्णी त्वरीत काढावी.
– अशोक येवले (ग्रामस्थ)