मांजरी – शेवाळवाडीमध्ये पिण्याचे तसेच वापरण्यासाठी पाणी उपलब्ध होत आहे. मात्र, पाणी साठवणूक करण्यासाठी तसेच पाणी वितरण करण्यासाठी योग्य उपाययोजना नसल्याने शेवाळेवाडीतील अनेक भागांना पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. केवळ महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पाणीपुरवठा समस्या निर्माण झाली आहे.
शेवाळेवाडी गावाला महापालिकेकडून टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे, याशिवाय उपलब्ध विहिरी व कालव्यातूनही वापराचे पाणी मिळत आहे. परंतु, टँकरने पाणी सोडण्यात येणाऱ्या पाणी साठवणूक टाक्यांची दुरवस्था झाल्याने काही दिवसांपासून टाक्या कोरड्या आहेत, त्यामुळे अशा टाकीवर अवलंबून असलेल्या नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
अनेक टाक्यांचे नळ तुटले आहेत. काही टाक्यांना तडे गेले आहेत, अनेक टाक्याना झाकने नाहीत, टाक्या उघड्या असल्याने त्यामध्ये कचरा व धूळ जाऊन पाणी दूषित होत आहे. तर, काही टाक्या चोरीला गेल्या आहेत. महापालिका पाणीपुरवठा विभागाने शेवाळवाडीतील पाणीपुरवठा वितरणाकडे लक्ष द्यावे ,अशी मागणी होत आहे.
“पाणी साठवण करणाऱ्या टाक्यांना नळ नसल्याने तसेच त्यांना तडे गेलेले असल्याने अशा टाक्यांतून पाणी वाहून जाते, यामुळे पालिकेकडून येणाऱ्या टँकरचे पाणी यामध्ये सोडले जात नाही. काही ठिकाणी टँकर परस्पर इतर ठिकाणी वळवले जात आहेत. या सर्व बाबी संबंधित अधिकाऱ्यांना कळविल्यानंतरही दुर्लक्ष होत आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे याप्रश्नी दुर्लक्ष असल्याने ही समस्या वाढत चालली आहे.”- राहुल शेवाळे, माजी उपसरपंच, शेवाळेवाडी
“शेवाळवाडी गावातील पाणीपुरवठा संदर्भात सर्व अधिकारी काळजीने लक्ष देत आहेत. कोणाकडूनही हलगर्जीपणा केला जात नाही. तीन-चार टाक्यांना नळ नाहीत त्या ठिकाणी बसविण्यात येतील. एका ठिकाणी पाण्याची लाइन फुटल्याची तक्रार आहे. तीही दुरुस्त करण्यात येणार आहे.” – इंद्रभान रणदिवे, अधिक्षक अभियंता, महापालिका