पुणे – महापालकिा हद्दीत आजपर्यंत सुमारे 20 हजारांपेक्षा जास्त बालके करोनाबाधित झाली आहेत. सर्वाधिक बाधितांची नोंद यंदाच्या मार्च आणि एप्रिलमध्ये झाली आहे. त्यातूनही एप्रिलमध्ये सर्वाधिक म्हणजे 6 हजार 360 बालके बाधित झाली आहेत. ही आकडेवारी शून्य ते 10 वर्षे या वयोगटातील आहे.
गेल्यावर्षी बहुतांश बाधित संख्या प्रौढ आणि वृद्धांची होती. त्यावेळी बालकांना याची लागण झाली तरी ते जास्त धोकादायक नसेल असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे होते. तरीही त्यावेळी जुलै-2,295, ऑगस्ट-2,308 आणि सप्टेंबर-2,417 या प्रमाणात लहानमुले बाधित झाली आहेत. परंतु यंदा दुसऱ्या लाटेत बालकांना बाधा होण्याचे प्रमाण वाढले असून, मार्च आणि एप्रिलमध्ये ती संख्या सर्वाधिक झाली आहे. त्यातूनही एप्रिलमध्ये सहा हजारांच्या पुढे बाधित मुलांची संख्या गेली असून, या महिन्यात ती 6 हजार 360 एवढी नोंदवली गेली. तर मार्चमध्ये 2 हजार 382 इतकी बाधित मुलांची संख्या होती.
“तिसरी संभाव्य लाट ही लहानमुलांसाठी अधिक धोकादायक आहे’ असे भाकित करण्यात आले आहे. त्यादृष्टीने संपूर्ण देशातच बालकांच्या आरोग्याविषयीचे मंथन सुरू झाले आहे. त्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रात मराठवाड्यात बाधित मुलांची संख्या सर्वाधिक आहे.
तिसरी लाट लहानमुलांसाठी किती धोक्याची आहे, याविषयी अनेक मतमतांतरे आहेत. “एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही तिसरी संभाव्य लट लहान मुलांसाठी तितकी धोकादायक नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तरीही खबरदारी म्हणून राज्यांनी तयारी करण्याला सुरूवात केली आहे.