सुजित शिंदे (दिशा परिवार)
पंडित नेहरू एक असे राजनेते होते ज्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव प्रत्येकाच्या जीवनावर पाडला आहे. आज 27 मे रोजी त्यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त…
पंडित नेहरू हे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकतांत्रिक, गणतंत्राचे गणितज्ज्ञ देखील मानले जातात. ते स्वातंत्र्यचळवळीचे सेनानी होते. अनेकांना इतिहासाच्या पुस्तकाबाहेर नेहरू म्हणजे कोण, हे अजूनही माहीत नाही. नेहरू सधन घरात जन्माला आले असले, तरी त्यांनी 1921 ते 1945 या 23 ते 24 वर्षांत एकूण नऊ वर्षे तुरुंगात काढली आहेत.
गांधीजींनी नेहरूंना आपला वारस, आपला मानसपुत्र मानावा यातच त्यांचे मोठेपण आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांना सध्याच्या राजकारणात खलनायक ठरविण्याचा खटाटोप चालू आहे. पंडित नेहरूंचा द्वेष करता करता त्यांच्याशी स्पर्धा केली जाते, त्यांची नक्कल केली जाते यातच नेहरूंचे मोठेपण दडलेले आहे.
नेहरूंचा कितीही द्वेष केला तरी इतिहासकार त्यांची नोंद आधुनिक भारताचे शिल्पकार अशीच घेतात. माणसाचे मूल्यमापन हे काळाच्या संदर्भातच करावे लागते. काळाचा संदर्भ सोडून व्यक्तीच्या कार्याची चिकित्सा करणे अशास्त्रीय आहे.
सध्या भारताचा प्रवास “सायन्सकडून स्युडो सायन्सकडे’, “विज्ञान व शास्त्रज्ञांकडून कर्मकांड व बाबाबुवा-साध्वी’ यांच्याकडे व “लोकशाही स्वातंत्र्याकडून फॅसिझम’कडे चालला आहे. हे थोपविण्यासाठी म्हणूनच पंडित नेहरूंची आधुनिक भारताची दृष्टी परत परत अभ्यासणे आवश्यक आहे आणि त्यातून स्वतःला कसे समृद्ध करता येईल हे तरुणांनी पाहावे.
भारतात आज नेहरू विचारधारेची खूपच आवश्यकता आहे. कारण सध्या भारतात जो वैचारिक भ्रष्टाचार चालू आहे तो भारताला भविष्यात उद्ध्वस्त करू शकतो.
आपल्या पिढीतील बहुतेक सर्वांप्रमाणे नेहरू या नावाचे गारुड आहे. पण त्यांच्याविषयी आज समाजात अनेक नकारात्मक गोष्टी पसरवल्या गेल्या आहेत. पण आपण जेव्हा त्यांच्या अभ्यासाला सुरुवात करता तेव्हा आपल्याला जाणवते, नेहरूंना समजावून घेऊन दुसऱ्याला समजावणे हे खूप कठीण व आव्हानात्मक आहे.
नेहरूंना समजावून घेणे अधिक कठीण का आहे, तर नेहरू शोभादर्शक यंत्रासारखे म्हणजे कॅलिडोस्कोपसारखे आहेत. कॅलिडोस्कोप कसाही फिरवा आणि बघा, एक नवी विलोभनीय नक्षी आपणासमोर येते.
पाच दशकांपेक्षा जास्त काळ नेहरूंनी भारताच्या राजकारणात योगदान दिले आहे. बाहेरच्या देशामध्ये शिकायला असतानासुद्धा त्यांचे भारताच्या राजकारणावर विशेष लक्ष होते. त्यांनी हळूहळू कॉंग्रेसी विचारधारा समजून घेऊन राजकारणात पाऊल ठेवले होते. 1916 मध्ये पंडित नेहरू गांधीजींना भेटले तेव्हापासून ते कायम कॉंग्रेसच्या प्रत्येक घडामोडीत अग्रभागी असायचे.
आपला देश स्वतंत्र झाला, त्यावेळी हा देश भुकेलेला होता. अन्नधान्य मोजून-मापून जनतेला द्यावे लागत असे. फाळणीनंतर वेगळ्या झालेल्या 20-25 टक्के लोकांकडे 75 टक्के सिंचित जमीन गेली होती. उरलेला भूभाग वैराण होता. आज हा देश अतिरिक्त धान्य पिकवतो. देश स्वतंत्र झाला, त्यावेळी देशात टाचण्या, ओगलेंचे कंदील आणि किर्लोस्करांचे लाकडी नांगर होते.
आज या देशात निर्माण होत नाही, निर्माण होऊ शकणार नाही अशी वस्तू दाखवता येणार नाही. त्या वेळच्या अडाणी, अर्धशिक्षित देशातील शिक्षित तरुणांना आज जगभर मागणी आहे. त्यावेळी ज्या विषयावर बोलणे पाप होते, ते कुटुंबनियोजन आज देशाने स्वीकारलेय.
हे स्थित्यंतर कसे झाले, ते अजिबात लक्षात घेतले जात नाही. मात्र, अणुऊर्जा आणि अंतरिक्ष यातील नेहरूंचे योगदान आपल्याला थोडेफार तरी माहीत आहे. आज हा लोकशाही रुजलेला देश झपाट्याने प्रगती करतोय.
सध्याच्या भारताच्या राजकारणात भ्रष्टाचार हा खूप मोठा विषय आहे. पंडित नेहरूंना भ्रष्टाचाराबाबत प्रचंड चीड होती. नेहरूंनी भ्रष्ट माणसांना आपल्याजवळही येऊ दिले नाही आणि अगदी जवळच्या सहकाऱ्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला. मुंद्रा यांच्या उद्योगात आयुर्विमा मंडळाने केलेल्या भांडवली गुंतवणुकीवर आक्षेप घेण्यात आल्यावर त्यांनी न्या. छगला यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.
समितीला “फास्ट ट्रॅक कोर्ट’प्रमाणे झपाट्याने चौकशी करण्यास सांगितले. त्या समितीच्या अहवालात अर्थमंत्री टी. टी. कृष्णम्माचारी यांच्यावर फक्त ठपका ठेवला होता. तरी नेहरूंनी त्यांना मंत्रिमंडळातून काढले. त्यावेळी “न्यूयॉर्क टाइम्स’ आणि लंडनचे “इकॉनॉमिस्ट’ यांनी “नेहरू प्रगत देशांसाठीसुद्धा लोकशाहीतील नवे मानदंड प्रस्थापित करताहेत’, असे लिहिले.
पंडित नेहरूंना संस्था उभ्या करणे आणि त्यांना जोपासणे याचा जणू छंदच होता. त्यामुळे देशात विविध क्षेत्रांतील संस्थात्मक पायाभरणीच्या कामात त्यांनी स्वतः विशेष लक्ष घातले होते. देशाला मागासलेल्या अवस्थेतून पुढे नेण्यासाठी आवश्यक अशा संस्थांची उभारणी करण्याकडे नेहरूंचा कल होता. आज ज्या अनेक संस्था त्यांच्या गुणवत्तेसाठी आणि देशाच्या विकासात दिलेल्या योगदानासाठी ओळखल्या जातात.
त्यांची पायाभरणी नेहरूंच्या काळात झाली. वेगवान आर्थिक विकासासाठी मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञ आणि व्यवस्थापक लागतील हे ओळखून त्यांनी देशात आयआयटी आणि आयआयएमची उभारणी केली. मात्र, तंत्रशिक्षणात प्रगती करीत असताना मूलभूत वैज्ञानिक संशोधनाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून टाटा मूलभूत वैज्ञानिक संस्थेचीही (टीआयएफआर) मुंबईत स्थापना केली.
त्याचप्रमाणे एकूण विद्यापीठीय शिक्षणाचे नियमन करता यावे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना केली. कलाक्षेत्रात संगीत नाटक अकादमी आणि दिल्लीत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेली साहित्य अकादमी, तर सिनेमा निर्मितीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देता यावे यासाठी पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूट या संस्था नेहरूंच्या काळातीलच आहेत.
नेहरू समजून घेताना आपल्याला त्यांच्या अनेक छोट्या गोष्टी खूप काही शिकवून जातात. ते बाहेर जायला गाडीने निघायचे त्यावेळी एखादा नळ उघडा दिसला तर गाडी थांबवून ड्रायव्हरला नळ बंद करण्यासाठी धाडायचे. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये नेहरूंच्या राहण्याची व्यवस्था एका खास महालात करण्यात आली होती.
या महालातून निघताना ते स्वतः दिवे बंद करायचे. व्यासंग व्यापक असल्यामुळे विषयांचे बंधन पंडित नेहरूंना कधीच नव्हते. इतिहास, वर्तमान, जागतिक आणि राष्ट्रीय राजकारण, सामाजिक चळवळी, धर्मचिंतन व विवेकवाद, काव्य, नाट्य यावर ते लिहीत व बोलत असत.
वेद, उपनिषिद, वेदांतापासून ते कालिदासांच्या संस्कृत काव्यापर्यंत आणि सिग्मंड फ्राइड यांच्या “इडिपस कॉम्प्लेक्स’ मानसशास्त्रीय संकल्पनेपासून निशस्त्रीकरणापर्यंत त्यांचे चिंतन, मनन आणि लेखन सतत चालू असे. अशा या महामानवाला आपण जेवढे समजून घ्याल तेवढे कमी आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.