पुणे – करोनाच्या दुसऱ्या लाटेतून शहरात पूर्वपदावर येत आहे. या स्थितीत शहरातील अर्थचक्रही सुरळीत होणे आवश्यक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता, लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने तसेच अनलॉक करताना रुग्णसंख्येचा कल लक्षात घेऊनच निर्णय घेतला जावा, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. त्यासाठी शुक्रवारी होणाऱ्या पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत ही भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हिड रिस्पॉन्स आणि महापालिकेतील अधिकारी तसेच पदाधिकारी यांच्या बैठकीचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. तिसऱ्या लाटेची तयारी तसेच लसीकरण या विषयावर या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी बोलताना महापौरांनी ही भूमिका मांडली आहे.
महापौर म्हणाले, “शहराने वर्षभरात करोनाच्या दोन लाटांचा सामना केला. पहिल्या लाटेवेळी दोन लॉकडाऊनचा सामना करावा लागला. अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी करण्यात आलेल्या अनलॉकमुळे उद्भवलेली स्थिती आणि आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण सर्वांनी पाहिला. त्यामुळे पुन्हा अनलॉक करताना सर्व घटकांचा सारासार विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे, संपूर्ण अनलॉकचा निर्णय न घेता टप्प्याटप्प्याने अनलॉक करावे अशी आपली भूमिका आहे.’