पुणे -करोनामुळे घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांना अनपेक्षित सर्वोत्तम गुण मिळाले. मात्र सध्या करोनावरील सर्व निर्बंध हटविल्यानंतर विविध कंपन्यांकडून होत असलेल्या भरतीत विद्यार्थ्यांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या गुणांवर होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी कंपनी स्वत:च परीक्षा घेऊन पात्र विद्यार्थ्यांची निवड करीत आहे. त्यामुळे करोनाकाळात झालेल्या ऑनलाइन परीक्षेतील गुणांचे महत्त्व कमी होत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थीहित लक्षात घेता राज्य सरकारच्या निर्देशानुसार सर्व विद्यापीठांनी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा घेतली. या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले गुण पाहता अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे अजूनही विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षेची मागणी कायम आहे. ऑनलाइन परीक्षेत कोणतीही प्रात्यक्षिक होऊ शकली नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष कंपन्यातील कामकाज कसे असते, हीच कल्पना विद्यार्थ्यांना नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची सध्याची गुणवत्ता लक्षात घेऊन स्वत: कंपनीमार्फत प्रवेश परीक्षा घेत आहेत आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड केली जात आहे.
दरवर्षी विविध कंपन्यांकडून कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणावर नोकरीसाठी निवड केली जाते. मात्र, दोन वर्षे करोनामुळे सर्व महाविद्यालये बंद आहेत. काही अपवाद वगळता ऑनलाइन कॅम्पस इंटरव्ह्यू झाले. मात्र, त्यास कंपन्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. आता करोनावरील सर्व निर्बंध हटविण्यात आले. त्यामुळे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन त्याची गुणवत्ता तपासली जात आहे. त्यात आता स्वत: कंपन्यांकडून परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जात असल्याने करोना काळातील गुणांवर आता सांशकता व्यक्त केली जात आहे.