पुणे, दि. 30 -दिवाळीच्या सुट्या संपवून कार्यालये सोमवारपासून सुरू होत आहेत. त्यामुळे दिवाळीसाठी गावी गेलेले पुण्यातील रहिवासी आता परतू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरात येणारे सर्व महामार्ग, एसटी स्थानके रेल्वे स्टेशनवरही गर्दी दिसून आली. तर, मुंबई, नगर, सातारा आणि सोलापूरकडून येणाऱ्या मार्गांवर रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
राज्यातील विविध जिल्ह्यातून पुण्यात वास्तव्यास असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सुट्टीत पुण्यातून गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. याच काळात इतर जिल्ह्यांतून पुण्यात येणाऱ्यांची संख्याही अधिक असते. पुण्यातील पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्यांची संख्याही या काळात अधिक असते. दिवाळीनिमित्त शाळा आणि कॉलेजला 10 ते 15 बारा दिवस सुट्टी होती. आता ही सर्व मंडळी आपापल्या कामाच्या ठिकाणी परतू लागली आहे.
रविवारी पुणे-सोलापूर, पुणे-नगर, पुणे-सातारा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना एक किलोमीटरसाठी 40 ते 50 मिनिटे वेळ लागत होती. महामार्गावर वाहनांच्या रांगा असल्यामुळे शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर कोंडी झाली होती. उत्तर भारतात छटपूजेनिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिक जात असतात. रेल्वे स्टेशनवर ही गर्दीही दिसून आली.