संक्रमणाचा धोका, आर्थिक परिस्थितीमुळे 49 कैद्यांनी जामीन नाकारला
संजय कडू
पुणे – करोनाच्या कारणासाठी तात्पुरता जामीन मिळण्यासाठी पात्र असूनही राज्यातील 49 कैद्यांनी जामीन नाकारला आहे, तर शेकडो कच्चा (अंडर ट्रायल) कैद्यांनी जामिनासाठी अर्ज करण्यास नकार दिला आहे. करोनाच्या काळात घरी परतल्यावर संक्रमणाचा धोका, आर्थिक परिस्थितीमुळे उपजीविकेचा प्रश्न आणि वैद्यकीय सुविधा मिळण्याचा अभाव म्हणून कैद्यांनी कारागृहातच राहण्यास पसंती दिली.
तात्पुरत्या स्वरूपात का होईना मोकळा श्वास घेण्यास या कैद्यांनी नकार दिला आहे. मागील महिन्यात कोणत्याही कैद्याला त्याच्या इच्छेशिवाय जामीन देता येणार नाही अथवा आपत्कालीन पॅरोलवर सोडता येणार नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. लॉकडाऊन काळात जगण्यासाठी नोकरी करण्यात अथवा उद्योग करण्यात अडचणी असल्याचे अनेक कैद्यांनी सांगितल्याचे कारागृह अधीक्षकांनी सांगितले.
करोनात मागील वर्षी आलेल्या पहिल्या लाटेनंतर कारागृहातील गर्दी कमी करून साथीच्या आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील 46 कारागृहांतील 10 हजार कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडले. ज्यांनी आपल्या शिक्षेची मदत पूर्ण केली नाही, अशा 68 कैद्यांना आपत्कालीन पॅरोलवर सोडले. हा कालावधी त्यांच्या शिक्षेत धरला जाणार नाही.
गेल्या वर्षी मे महिन्यात आणि त्यानंतर सोडलेल्या कैद्यांनी आपण होऊन परत येऊन त्यांची शिक्षा पूर्ण करणे आवश्यक आहे. सध्याचा साथरोग कायदा उठवला नाही अथवा त्यांच्या जामिनात वाढ झाली नाही तर त्यांनी कारागृहात परत येणे अपेक्षित आहे. ज्या कैद्यांची काही महिनेच शिक्षा शिल्लक राहिली आहे ते परत येण्याऐवजी आमच्या चांगल्या वर्तणुकीसाठी शिक्षेत सवलत देऊन सोडण्याची मागणी करत आहेत.
काही कैदी असे आहेत की, त्यांना कुटुंबीयच नाहीत किंवा त्यांना सामाजिक पाठिंबा नाही. अशा स्थितीत किमान कारागृहात आपल्याकडे वैद्यकीय लक्ष पुरवले जाईल किंवा शासकीय रुग्णालयात तरी दाखल करतील, अशी अपेक्षा अनेकांची आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. राज्यातील कारागृहात साथ सुरू झाल्यानंतर कारागृहात 4 हजार 961 बाधित झाले. त्यात 4 हजार 49 कैदी होते, तर 912 कर्मचारी होते. त्यात 13 कैद्यी आणि नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
बाहेर जगण्याचा प्रश्न कठीण
करोनाच्या काळात कारागृहातून बाहेर पडल्यावर जगण्याचा प्रश्न कठीण आहे. या काळात रोजगारही मिळणार नाही, तसेच घरातील अनेक सदस्यांचे रोजगारही हिरावले गेले आहेत. तसेच कारागृहातून बाहेर पडल्यास करोनाची लागण होण्याची शक्यता जास्त आहे. बाहेर वैद्यकीय सुविधा असो वा लसीकरण मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. कारागृहात मात्र वैद्यकीय सुविधा तातडीने मिळत आहेत, तसेच लसीकरणही वैद्यकीय पथक कारागृहात येऊन करत आहे. आजवर 4 हजार कैद्यांना करोनाची प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
कारागृहात कैद्यांना योग्य त्या वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात, तसेच सकस भोजनही दिले जाते. सोशल डिस्टन्सची अंमलबजावणीही योग्यरितीने करण्यात येते. करोनापासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाते. राज्यातील सर्व कारागृहांना कोविड सेंटरशी संलग्न करून घेतले आहे. एखाद्या कैद्याला लक्षण दिसताच त्याला लगेचच वैद्यकीय मदत दिली जाते.
– सुनील रामानंद, अतिरिक्त महासंचालक, कारागृह