पुणे, पिंपरी चिंचवड मनपा, “पीएमआरडीए’च्या प्रकल्पांसह मेट्रोचे लोकार्पण
कर्नाटक, राजस्थानमधील कॉंग्रेस सरकारवर टीका
पुणे – “महाराष्ट्राचा आणि पर्यायाने पुण्याचा विकास होत आहे. त्या तुलनेत कर्नाटकातील बंगळुरू मोठे आयटी हब असूनही तितका विकास होऊ शकला नाही. कर्नाटकात चुकीच्या घोषणा करून सत्ता बनविण्यात आली. एखादा पक्ष आपल्या स्वार्थासाठी सरकारची तिजोरी रिकामी करतो, त्याचे नुकसान राज्यातील जनतेला भोगावे लागते, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक सरकारवर टीका केली. राज्यस्थानमध्येही तशीच परिस्थिती आहे. देशाला विकसित राष्ट्र म्हणून पुढे नेण्यासाठी नीती, नियत आणि निष्ठा महत्त्वाची असल्याचे मोदी यांनी म्हटले.
पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए यांच्या कार्यक्षेत्रातील विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि आणि मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
पंतप्रधान म्हणाले, “कर्नाटकातील बंगळुरू शहर जागतिक गुंतवणुकीचे केंद्र आहे. अशावेळी कर्नाटक आणि बंगळुरूचा विकास होण्याची गरज होती. पण, ज्या प्रकारच्या घोषणा करून कर्नाटकात सरकार बनवण्यात आले, त्याचे दुष्परिणाम सगळा देश पाहत आहे. पक्षांचे सरकार बनत असते, पण लोकांचे भविष्य धोक्यात घातले जाते. विकासासाठी पैसे नाहीत, असे कर्नाटक सरकार स्वत: सांगत आहेत. ही देशासाठी चिंताजनक बाब आहे. राजस्थान राज्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे,’ अशी टीकाही पंतप्रधानांनी राजस्थान सरकारवर केली आहे.
“पुणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे शहर आहे,’ असे सांगत मोदी म्हणाले, “पुण्यातील नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी सरकार काम करत आहे. पुण्यात पाच वर्षांत 24 किलोमीटर लांबीची मेट्रो सेवा सुरू झाली आहे. देशात नऊ वर्षापूर्वी 100 स्टार्ट अप होती. आता लाखाहून अधिक स्टार्ट अप सुरू आहेत.
देशात 2014 पर्यंत 250 किलोमीटरच मेट्रो मार्गिका होती. आता देशात 800 किलोमीटरपेक्षा अधिक मेट्रो मार्गिका सुरू झाली आहे. याशिवाय हजार किलोमीटरपेक्षा अधिकच्या नव्या मेट्रो मार्गिकांचे कामही सुरू आहे. 2014 साली फक्त पाच शहरांमध्ये मेट्रो धावत होती. आता देशातील 20 शहरांत मेट्रो धावत असल्याचे मोदी यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनीही महाराष्ट्र सरकारच्या विकास प्रकल्पांची माहिती दिली.
तिघांचे “रोल’ वेगवेगळे… फडणवीसांची टोलेबाजी
“मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाला मी होतो, शिंदे साहेब आणि अजितदादा देखील होते. पण तिघांचे रोल वेगळे होते. मी विरोधी पक्षनेता होतो, अजितदादा उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते. पण, आता मात्र पुण्याच्या स्वप्नांना गती देण्यासाठी, आम्ही सगळे एकत्र आलो आहोत, अशी मिश्किल टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुणे मेट्रोचा एक नवीन टप्पा आज सुरू होत आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. आता त्यांच्याच हस्ते दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होत आहे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पुणे देशातील उत्तम शहर आहेच पण मोदींच्या नेतृत्वात ते सर्वोत्तम करून दाखवू. पुण्याला नवे रिंगरोड व नवे विमानतळ देणार आहोत. पुणे ही स्वप्नपूर्तीची नगरी होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अजित पवारांकडून मोदींवर स्तुतिसुमने अन् पुणेकरांच्या संयमाला सलाम
“पुण्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच साथ दिली आहे. ते महाराष्ट्रातील विकासाला सहकार्य आणि प्रोत्साहन देत असतात. ते देशाच्या विकासाचे नेतृत्व करतात,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. “मेट्रोसारख्या प्रकल्पाची कामे होत असताना पुणेकर, पिंपरी-चिंचवडकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण, नागरिकांनी सहनशीलता दाखवली. मी पुणेकरांच्या सहनशीलतेला सलाम करतो. मेट्रोचे काम सुरू असताना अनेक प्रश्न निर्माण झाले होते. परंतु पुणेकरांनी राजकारण न करता सर्व लोकप्रतिनिधींनी साथ दिली. आता ट्रिपल इंजिनच सरकार आहे. मोदींच्या हस्ते ज्यांना घर मिळणार आहे, त्यांनी ते घर विकण्याचा विचारही मनात आणू नये,’ असा सल्लाही पवार यांनी दिला.