महाविकास आघाडीने बंद केलेली योजना पुन्हा सुरू; फरकासह मिळणार रक्कम
पुणे – आणीबाणीच्या काळात कारावास सोसलेल्यांसाठी सुरू असलेली मासिक पेन्शन योजना महाविकास आघाडीने बंद केली होती. आता राज्यात सत्तांतर होऊन शिंदे सरकार आले असून, देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेली ही योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. योजना बंद झाल्याच्या कालावधीपासून थकबाकी देण्याससुद्धा मान्यता देण्यात आली. या योजनेचा लाभ पुणे जिल्ह्यातील 533 व्यक्तींना मिळणार आहे.
देशात 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या कालावधीत आणीबाणी घोषित करण्यात आली होती. या कालावधित ज्या व्यक्तींना बंदीवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान करण्याचा प्रस्ताव 2 जानेवारी 2018 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते.
दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळात सुरू केलेली ही योजना महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. करोनाच्या संकटामुळे राज्याच्या महसुलात घट झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे कारण देत महाविकास आघाडीने दि. 31 जुलै 2020 रोजी ही योजना बंद केली. त्यामुळे आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्यांना पेन्शन मिळणे बंद झाले.
अशी मिळणार रक्कम
आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक दहा हजार रुपये व त्यांच्या पश्चात पत्नीस अथवा पतीस पाच हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. तसेच एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक पाच हजार रुपये, तर त्यांच्या पश्चात पत्नीस अथवा पतीस अडीच हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.