येरवडा -साहेब, काही करू नका. तुमच्याकडे पुरेसे पोलीस नाहीत, तर नसू द्या. मात्र, दोन ते तीन अधिकारी असे द्या की त्यांना पाहताच गुन्हेगार थरथर कापायला लागतील. पुर्वी असे अधिकारी होते. आवाज ऐकताच चौकातील टवाळखोर धूम ठोकायचे. आता लहान मुलेही गांजाच्या आहारी गेली असून, ते वाहने फोडत आहेत. अशा तक्रारींचा पाढा येरवडा भागातील नागरिकांनी पोलीस उपायुक्तांसमोर वाचला. येरवडा पोलीस स्टेशन आणि नागरिकांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे निरीक्षक उत्तम चक्रे, विल्सन चंदेवळ, ज्योती चंदेवळ आणि लक्ष्मीनगर येथील नागरिक उपस्थित होते.
येरवड्यात गांजा, मद्य, गुटख्यासह नशेचे पदार्थ मिळतात. विद्यार्थिनिंची छेड काढली जाते. रात्री-अपरात्री घोळक्याने हातात शस्त्रे घेवून फिरतात. वाहनांमधील पेट्रोल चोरले जाते. याची तक्रार केली असता त्यावर कारवाई केली जात नाही, असा आरोप नागरिकांनी केला.
लक्ष्मीनगर भागात सीसीटीव्ही लावण्यासाठी पाठपुरावा करू. नागरिकांच्या मदतीशिवाय व्यसनाधिनता आणि गुन्हेगारी कमी होणार नाही, यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा आहे. तक्रारी आणि सूचनांवर कार्यवाही करण्यात येईल.
– किशोर जाधव, सहायक पोलीस आयुक्त, येरवडा
आपला मुलगा बिघडू नये, यासाठी आई-वडिलांनी पुढाकार घ्यावा. मुलांवर संस्कार करुन चांगला नागरिक करण्याची मोठी जबाबदारी आईवर आहे. मुलगा व्यसन करतो, त्यासाठी त्याच्याकडे पैसे कोठून येतात? त्याचे मित्र कसे आहेत? हे पाहणे गरजेचे आहे. रात्रीची पेट्रोलिंग आम्ही वाढवू. तसेच राज्य राखीव बलाची एक तुकडी येथे कायमस्वरुपी असेल.
– शशिकांत बोराटे,पोलीस उपायुक्त परिमंडळ 4
नागरिकांच्या तक्रारी…
नशेचे पदार्थ कोठे मिळतात, कोठून येतात हे सर्वांना माहिती आहे. पण, कारवाई होत नाही. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी. रात्री दोन-तीन वाजेपर्यंत गल्लीबोळांत चालणारी हॉटेल, चायनीजच्या टपऱ्या बंद कराव्यात. नेत्यांच्या वाढदिवसाच्या फ्लेक्सवर गुंड मुलांचा फोटो असतो. त्या नेत्यांवरही कारवाई करा