पुणे (कल्याणी फडके)- पुणे महानगर परिवहन महामंडळाने वर्धापन दिनानिमित्त “बस डे’चा “इव्हेंट’ साजरा केला. 18 एप्रिल रोजी 1800 बसेस मार्गावर सोडल्या. दोन दिवस प्रवाशांना आकर्षक सुविधा, सवलती दिल्या. मात्र या “इव्हेंट’नंतर अवघ्या 24 तासांतच ठेकेदारांनी बसेसची सेवा स्थगित केली आणि लाखो प्रवासी वेठीस धरले. त्यामुळे एकीकडे 1 हजार 800 बसेस धावलेल्या शहरात 1 हजार बसेस देखील शुक्रवारी धावू शकल्या नाहीत. त्यामुळे “सक्षम’ वाहतुकीकडे प्रवास करू इच्छिणाऱ्या पीएमपी बसेसबाबत “आत्मनिर्भर’ असल्याची गरज प्रकर्षाने वाटू लागली आहे.
सुलभ, परवडणारे, कार्यक्षम, विश्वसनीय आणि सुरक्षित वाहतूक सेवा देणे पीएमपीचे लक्ष्य आहे. मात्र शहरात सेवा पुरवत असताना परवडणारी, सुरक्षित जरी बससेवा असली तरी मात्र सामान्यांना अपेक्षित असणारी कार्यक्षम, विश्वसनीय या कसोट्यांवर अद्याप पीएमपी कासवगतीनेच पुढे सरकत असल्याचे चित्र आहे. यासह पीएमपीच्या ताफ्यात एकूण 2 हजार 192 बसेस आहेत. त्यामुळे सुमारे 950 हून अधिक बसेस या ठेकेदारांच्या आहेत. त्यामुळे संचलनाची जवळपास निम्मी धुरा ही कंत्राटी बसेसवर अवलंबून आहे. याच बस पीएमपीच्या असत्या तर, सेवेत सुरू राहिली असती.
4,250 बसेसची गरज
संस्थांच्या सर्व्हेनुसार एक लाख लोकसंख्येमागे सरासरी 50 बसेस प्रमाण मानल्या जातात. मात्र पुण्यात एक लाख लोकसंख्येमागे सुमारे 22 बस संचलनात असल्याची स्थिती आहे. यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवडची 85 लाख लोकसंख्या गृहित धरल्यास 4, 250 बसेसची गरज आहे.
सार्वजनिक वाहतूक न वापरण्याची कारणे काय?
“बस डे’ इव्हेंट’च्या कालावधीत नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पीएमपीने सोशल मीडियावर “व्हाय नॉट पब्लिक ट्रान्स्पोर्ट’ असा “हॅशटॅग’ देखील वापरला. मात्र या “इव्हेंटस’च्या आधी आणि नंतर केंद्रस्थानी असणाऱ्या “प्रवाशांना’ पुन्हा गर्दीने भरलेली, वेळेत न येणारी, विचित्र आवाज असणारी, दरवाजे तुटलेल्या बसेसमधून प्रवास करावा लागत असल्याने “का नाही सार्वजनिक वाहतूक’ या वाक्याऐवजी “सार्वजनिक वाहतूक का नाही’ या वाक्यावरील प्रवाशांच्या प्रतिक्रियांची कारणमीमांसा प्रशासनाने करणे आवश्यक असल्याचे मत प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
बसेस अपुऱ्या, की अतिरिक्त?
उत्पन्नाला “भार’ हलका करणाऱ्या पीएमआरडीए हद्दीतील सेवा “आर्थिक गणितांमुळे’ बंद करण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र दुसरीकडे “अतिरिक्त’ बसेस लहान महापालिकांना देण्याच्या प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे नक्की पीएमपीच्या ताफ्यात अपुऱ्या बसेस आहेत की अतिरिक्त बसेस आहेत, हा प्रश्न प्रवाशांसाठी अनुत्तरीत आणि संभ्रमात टाकणारा आहे.