पुणे- शहराच्या मध्यवर्ती पेठांसह उपनगरांमध्ये सुरू असलेल्या खोदकामाला 30 एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर महिनाभरात पथविभागातर्फे त्याची दुरूस्ती करण्यात येईल, असा दावा मनपा पथविभागाकडून करण्यात आला आहे.
पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन विभागाबरोबरच काही खासगी कंपन्यांनाही खोदकामाची परवानगी देण्यात आली आहे.
शहराच्या विविध उपनगरांसह मध्यवर्ती पेठांमध्येही सध्या विविध कारणांसाठी खोदकाम सुरू आहे. काही ठिकाणचे खोदकाम झाल्यानंतर रस्ते व्यवस्थित पूर्ववत न केल्याने अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यावर तयार झालेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत कराव्या लागलेल्या लॉकडाउनमध्ये महापालिकेने मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले. या काळात मध्यवर्ती पेठांमधील रस्ते मोकळे असल्याने समान पाणीपुरवठा योजना आणि मैलापाणी वाहिन्या बदलण्याचे काम सुरू केले गेले. मात्र, शिथीलता आणल्यानंतर नागरिकांची वर्दळ वाढली. नागरिकांची टीका सुरू झाली त्यामुळे पुन्हा काम थांबवण्यात आले.
पावसाळ्यानंतर ही कामे पुन्हा सुरू करण्यात आली. पुढच्या पावसाळ्यापर्यंत म्हणजे 30 एप्रिलपर्यंत कामे संपवण्याची कंपन्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र या खोदकामामुळे रस्त्याने चालताना, वाहनचालवताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. मध्यवर्ती पेठांसह, चारही बाजूंच्या उपनगरांमध्येही खोदकाम सुरू आहे.
विविध यंत्रणा आणि कंपन्यांकडून खोदकाम केले जात असल्याने त्यांच्याकडून शुल्क आकारून पथ विभागामार्फतच रस्ते पूर्ववत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार एक मे तर 31 मे दरम्यान हे रस्ते पूर्ववत केले जातील. त्यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत कोणतेही खोदकाम होणार नाही. -व्ही. जी. कुलकर्णी, पथविभागप्रमुख, मनपा