पुणे – मार्केट यार्डात रस्त्यांवर लिंबू विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करत व्यवसाय बंद केल्याच्या निषेधार्थ रविवारी (दि. 29) दलित पॅंथरने तीव्र आंदोलन केले. बाजारात रविवारी सर्वाधिक आवक होते. नेमके याच दिवशी आंदोलन असल्याचा परिणाम, बाजारातील व्यवहारावर झाला. मार्केटयार्डचे मुख्य गेट तब्बत पाच ते सहा तास बंद ठेवले.
तर फुलबाजारातून असणारा छोटा रस्ताही बंद ठेवण्यात आला. त्यामुळे खरेदीदार, नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. फिरून जाऊन तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या गेटमधून बाजारात सोडण्यात येत होते. या आंदोलनामुळे शेतीमाल कमी खपला. तर कमी भाव मिळाला. तर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
डमी आडते आणि लिंबू विक्रेते यांच्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. डमी आडते शेतकऱ्यांचा शेतमाल कमी भावाने घेऊन गाळ्यासमोर तोच शेतमाल चढ्या भावाने विक्री करतात. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. गाळ्यांसमोर विक्री केल्यामुळे वाहतूककोंडी होते. तर, लिंबू विक्रेते आडतदारांकडून लिंबू खरेदी करून त्याची विक्री बाजारात मिळेल त्या मोकळ्या जागेवर करताता. या घटकांमुळेही वाहतूक कोंडी होते.
बाजार समितीने गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी केवळ विक्रेत्यांवर कारवाई करत लिंबू विक्री बंद केली. तसेच त्यांना बाजारात प्रवेशदेखील बंद केला. मात्र, डमी आडत्यांना मोकळीक दिली. लिंबू विक्रेत्यांवर तोडगा निघत नसल्याने दलित पॅंथरचे नेते यशवंत नडगम यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून मार्केटयार्डच्या मुख्य प्रवेशव्दारावर आंदोलन सुरू केले. तब्बल पाच ते सहा तास आंदोलन सुरू असल्याने बाजारात शेतमाल खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला.
आंदोलनामुळे मार्केट यार्डातील मुख्य दरवाजा तब्बल पाच ते सहा तास बंद ठेवण्यात आला. याचा फटका शेतकरी, खरेदीदारांसह आडत्यांनाही बसला. शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारात आणण्यास विलंब झाला. खरेदीदारांनाही बाजारात येण्यास अडसर झाला. आडत्यांकडेही मोठ्या प्रमाणात विक्री अभावी माल शिल्लक राहिला आहे. भाव कमी मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. त्याला कोण जबाबदार? लिंबू विक्री करण्याची मागणी करणाऱ्यांकडे कोणताही परवाना नाही. त्यामुळे हे आंदोलन बेकायदेशीर आहे.
– अमोल घुले, आडते, मार्केट यार्ड.
लिंबु विक्रेत्यांनी पोलिसांकडे आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. मात्र, ते आंदोलन कोठे करणार, याचा उल्लेख नव्हता. बाजार समिती प्रशासनाकडून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. तरीही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या आंदोलनकर्त्यांची मागणी चुकीची आहे. बाजारातील गाळ्यांपुढे व्यवसाय करतात. ते चुकीचे आहे. याबरोबरच ते दादागिरी करतात. त्याचा आडते आणि टेम्पो धारकांना त्रास होतो. पोलीस आणि पोलीस आयुक्तांना कारवाई करण्यासाठी निवेदन देणार आहोत.
– मधुकांत गरड, प्रशासक, पुणे बाजार समिती.
मार्केटयार्डमध्ये हातावर पोट असणाऱ्या पारधी आणि इतर वंचित समाजातील लोक रस्त्यावर लिंबू ,वेणी आणी इतर वस्तू विक्री करतात. त्यातून मिळणाऱ्या उपजिविकेवर पोट भरतात. कुंटुंब चालवतात. अशा लोकांना बाजार समितीने त्रास देणे सुरू केले आहे. यासाठी रविवारी सकाळी मार्केटयार्ड येथे प्रशासनाचा निषेर्धात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि दलित पॅंथरच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वंचित घटकांना पूर्वीप्रमाणे विक्रीस परवानगी द्यावी. न्याय द्यावा.
– यशवंत नडगम, आंदोलनकर्त्यांचे नेते