365 पैकी फक्त 267 दिवसच भरणार वर्ग; विद्यार्थ्यांना सुट्ट्यांचा भरभरून आनंद
करोनामुळे मागील एक वर्षांपासून शाळा बंद
पुणे – करोनामुळे मागील एक वर्षांपासून शाळा बंद असून, ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. यावर्षी दोन सत्रात असणारे शैक्षणिक वर्षात 365 दिवसांपैकी केवळ 297 दिवस शाळा भरणार आहे. त्यामध्येही जवळपास 30 ते 32 रविवार असल्यामुळे प्रत्यक्षात 267 दिवसच शाळा भरणार आहे.
दररोजचे दोन ते तीन तास ऑनलाइन शिक्षणाचे सोडले तर विद्यार्थ्यांनी मागील वर्षभर सुट्टीचा आनंदच घेत आहेत. यंदाचे शैक्षणिक वर्ष 15 जून 2021 पासून सुरू झाले आहे. मात्र, करोनाची दुसरी लाट ओसरत असताना आरोग्य विभागातील तज्ज्ञांकडून तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवित त्यामध्ये लहान मुले अधिक बाधित होण्याची भीती दर्शवली जात आहे. त्यामुळे जोपर्यंत करोना आटोक्यात येत नाही आणि शासनाकडून शाळा सुरू करण्याबाबत आदेश येत नाही, तोपर्यंत ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार आहे.
15 जून ते 30 ऑक्टोबर 2021 हे प्रथम सत्र असणार आहे. तर, 22 नोव्हेंबर 2021 ते 30 एप्रिल 2022 हे द्वितीय सत्र असणार आहे. पहिल्या सत्रामध्ये शाळेचे 137 दिवस असले, तरी त्यामध्ये 17 दिवस रविवार असल्यामुळे प्रत्यक्षात 120 दिवसच शाळा भरणार आहे. तर दुसऱ्या सत्रातही 160 दिवसामध्ये रविवारच्या सुट्ट्या वगळता 147 दिवस शाळा भरणार आहे.
त्याचबरोबर स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, अनंत चतुर्दशी, रामनवमी, महाराष्ट्र दिन, आषाढी एकादी, बकरी ईद, पतेती, मोहरम, गोपाळकाला, गणेश चतुर्थी, महात्मा गांधी जयंती, दसरा, ईद-ए-मिलाद, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, गुरूनानक जयंती, ख्रिसमस नाताळ, मकरसंक्रांत, प्रजासत्ताक दिन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महाशिवरात्री, धुलिवंदन, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/महावीर जयंती, गुडफ्रायडे, रमजान ईद, बुद्धपौर्णिमा या सुट्ट्याही असणार आहे. तसेच पहिले सत्र दिवाळीआधी संपेल.
त्यानंतर दिवाळीची सुट्टी 1 ते 20 नोव्हेंबर असणार आहे. तर उन्हाळी सुट्टी 2 मे ते 14 जून असणार आहे. 15 जून 2022 रोजी नवीन शैक्षणिक वर्षे सुरू होईल, अशी माहिती जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
त्यामध्ये मुख्याध्यापक अधिकारातील दोन स्थानिक सुट्ट्या आहेत. त्यामुळे यंदाही मुलांना सुट्ट्यांचा भरघोस आनंद घेता येणार आहे, मात्र हा आनंद घरात राहूनच घ्यावा लागणार आहे. त्यामुळे पालकांनीही करोनाचे संकट दूर होत नाही, तोपर्यंत मुलांना अनावश्यक घराबाहेर पडू देऊ नये, असे आवाहन केले आहे.