सर्वांनी मंथन करण्याचे केले आवाहन
पुणे – दूरदृर्ष्टीचा विचार करून वर्ष २०४७ मध्ये भारतीय शिक्षण व्यवस्था कशी असेल. यावर सर्वांनी मंथन करावे. जागतिक स्तरावरील शिक्षण व्यवस्थेत टिकण्यासाठी आमची स्पर्धा परदेशातील विद्यापीठांशी असेल, त्यावेळी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, असे मत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या समारोप समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पद्मभूषण डॉ. दीपक धर,
अभिजित पानसे, उद्योजक ईश्वरचंद्र परमार, डॉ. राजेंद्र शेंडे व डॉ. योंगेन्द्र मिश्रा हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड होते. तसेच एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड व सल्लागार डॉ.संजय उपाध्ये हे उपस्थित होते. या वेळी योग गुरु मारूती पाडेकर यांचा विशेष जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
डॉ. दीपक धर म्हणाले की, मानवाच्या कल्याणासाठी विज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. परंतु, त्याच बरोबर अध्यात्माची गरज ही आहे. धर्म हे जीवनात वर्तवणुकीसाठी असतात आजच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाबरोबरच अध्यात्माचे शिक्षण देणे गरजेचे आहे.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीने स्वार्थ आणि गर्व करू नये. समजा हे दोन्ही एकत्र आले तर विनाश होतो. त्यामुळे संत ज्ञानेश्वर यांची ज्ञानेश्वरी आणि भगवान गौतम बुद्धांचे पंचशील यांचा समन्वय घडेल तेव्हाच मानवजातीचे कल्याण होईल. तसेच पुढील वर्षापासून डब्ल्यूपीयूच्या प्रत्येक वर्गातील प्रथम व द्वितिय येणार्या विद्यार्थ्यांना या व्याख्यानमालेत समाविष्ठ करून घेऊ.