– विलास बांदल
वेल्हे -वेल्हे तालुक्यात मागील तीन महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य, सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडणुकीनंतर उद्भवलेले गावातील राजकीय वाद मिटणार असे वाटत असतानाच, तालुक्यात झालेल्या यात्रा-जत्रांमध्ये वाद- विवादाने डोके वर काढले आहे.
एखाद दुसरा अपवाद सोडल्यास प्रत्येक गावात धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम आणि गाववर्गण्या यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद-विवाद झाल्याचे पाहायला मिळाले. वेल्हे तालुक्यांमध्ये असे प्रकार मागील काही दिवसांपासून घडत असल्याने अनेक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करतानाच जे लोक गावागावांमध्ये राजकीय हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने असे प्रकार घडवून आणत आहेत त्यांचा निषेध केला आहे.
होळीआधी आणि त्यानंतर गुढीपाडव्यापर्यंत या भागातील अनेक गावांमध्ये यात्रा-जात्रांचा मोसम असतो. यानिमित्ताने शहराकडे गेलेले चाकरमानी देवदर्शनासाठी आणि पावसाळी पूर्व शेतीकामांसाठी गावाकडे येतात. मात्र अंतर्गत राजकारण करणाऱ्या गावपुढाऱ्यांमुळे गावतील शांतता भंग होत असल्याने या लोकांमध्ये नाराजी आहे. काही ठराविक लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी मूठभर कार्यकर्त्यांना हाताशी धरून असे प्रकार घडवून आणत आहेत हे निंदनीय आहे.
वेल्हे तालुक्यातील सद्यःस्थितीमध्ये गावाकडे राहणाऱ्यांचे प्रमाण 30 टक्क्यांपेक्षा अधिक नाही. हे जरी खरे असले तरीही गाव कारभार करणारी मंडळी ही शहरात वास्तव्य करतात आणि आपल्या परीने राजकारण घडवून आणतात. अशा प्रवृत्तीमूळे तालुक्यात गुंडगिरी वाढली असून नुकतेच काही गुन्हे घडले आहेत. गावाकडचा शिमगा आणि यात्रा जत्रा असल्या की लोक आनंदाने कुटुंबासह गावाकडे यायचे; परंतु सध्याचे ग्रामीण भागातील वातावरण पाहता गावाकडे येणाऱ्यांची संख्या घटते आहे.
मागील काही वर्षांपूर्वी मुळशी पॅटर्न चित्रपट सर्वत्र गाजला. तो विषय शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा होता पण सध्या शंका येऊ लागली आहे की भविष्यात वेल्हे पॅटर्नची कथा लिहायला लागते की काय.
– गुलाब रसाळ, नवनिर्वाचित सरपंच, गुंजवणे
निवडणुका पार पडल्या, यात्रा जत्रांचाही मोसम संपत आला, मात्र अजूनही कुठेही ग्राम विकासासाठी लोक एकत्र येताना दिसत नाहीत. ज्या ठिकाणी ग्रामविकासाची कामे चालू आहेत त्या ठिकाणी विरोधाला विरोध करण्याचे प्रकार वाढीस लागले असून अनेक कामे रखडली आहेत. यामुळे नवनिर्वाचित सरपंच, ग्रामसेवक यांची डोकेदुखी वाढली असून तालुका व जिल्हा स्थरावरील अधिकाऱ्यांच्या टेबलावर तक्रारींचे अर्जच्या अर्ज दाखल होत आहेत.
– कृष्णा शिंदे, ग्रामस्थ, केळद
ग्रामीण भागातील तरुणाई मध्ये वाढलेली व्यसनाधीनता, जमीन विक्रीतून आलेला पैसा आणि वाढीस लागलेली गुन्हेगारी वृत्ती ही खेड्यांतील शांतता भंग करीत आहे. भविष्यात अशा प्रकारचे सण साजरे होतील का, याचीच मोठी शंका आहे.
– विलास पांगारे, सामाजिक कार्यकर्ते, वेल्हे