हिरडस मावळ -भोर तालुक्यात यंदा जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने तालुक्यात असणारी दोन्ही धरणे 15 ऑगस्ट दरम्यान “फुल्ल’ झाली होती, तसेच नोव्हेंबरपर्यंत अधूनमधून पाऊस पडत होत, त्यामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठा जानेवारीपर्यंत मुबलक होता. गेल्या दोन महिन्यांत दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने शुक्रवार (दि. 24) रोजी भाटघर धरणात 44.95 टक्के, तर नीरा देवघर धरणात 57.31 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या भाटघर धरणातून 1 हजार 887 क्युसेक, तर नीरा देवघर धरणातून 840 क्युसेक पाणी पॉवर हाऊसमधून विसर्ग चालू आहे.
पाणी साठवण क्षमता 23.75 टीएमसी असलेल्या भाटघर धरणात 2021 ला 75.62 आणि 2022 ला 79.20 टक्के पाणी साठा होता. 22 फेब्रुवारी 2023 ला 63.67 टक्के, तर आजअखेर 24 मार्च रोजी 44.95 टक्के पाणी साठा आहे. 12.91 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या नीरा देवघर धरणात 2021 ला 65.93 टक्के आणि 2022 ला 67.65 टक्के पाणी साठा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होता.
यंदा 22 फेब्रुवारीला 75.00 टक्के, तर 24 मार्च अखेर 57.31 टक्के पाणीसाठा आहे. यावरून गेल्या एका महिन्यात पाणी साठा बऱ्याचअंशी कमी झाल्याचे पाहायला मिळतोय. याबरोबरच मागील दोन वर्षाच्या तुलनेत यंदा पाणी साठा कमी असल्याचेही दिसून येत आहे. यंदा मार्च संपत आला तरी अजून म्हणावा तसा तीव्र उन्हाळा नाही; पण पुढील दोन महिन्यांत उन्हाळ्याची तीव्रता वाढणार असल्याने पाणीसाठा अजून कमी होणार आहे.
महामार्गाच्या पूर्वेकडील भागाला पाणीपुरवठा
भाटघर धरणातून महामार्गालगतच्या पूर्वेकडील गावांना नीरा नदीपात्रातून पाणी मिळते. यामध्ये सारोळा, राजापूर, भांबवडे, पांडे आदी गावांना या पाण्याचा लाभ होतो. त्यानंतर बारामती, फलटण तालुक्यातील गावांना या धरणातून पाणीपुरवठा होतो. तर नीरा देवघर धरणातून नीरा नदीकाठावरील भोर तालुक्यातील आपटी, नांदगाव, पिसावरे, आंबेघर, शिरवलीमार्गे महामार्गालगतच्या पूर्व भागातील गावांना पाणीपुरवठा होत आहे. त्यानंतर हे पाणी वीर धरणात जाते.