इंदापूर -बोरी परिसरातील शेतकऱ्यांनी कष्टाने व जिद्दीने द्राक्ष व इतर फळबागांचे दर्जेदार उत्पादन घेत आदर्श निर्माण केला आहे. राज्यामध्ये शेततळ्यांचे गाव म्हणून बोरीची ओळख निर्माण झाली आहे. कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना द्राक्ष व फळे साठवणुकीसाठी मोठी मदत होत आहे. द्राक्ष, फळांसाठी निर्यात अनुदान वाढविणे, वाहतूक अनुदानातील अडचणी दूर करणे, जीएसटी रक्कम कमी करणे आदी संदर्भात केंद्र सरकारकडे प्रयत्न पाठपुरावा केला जाईल. राष्ट्रीय फळबाग लागवड योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी केंद्राकडे प्रयत्न करू, अशी ग्वाही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील बोरी येथे रामनाना शिंदे आणि भारत शिंदे यांच्या कोल्ड स्टोरेजला पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी ते बोलत होते. पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी येणाऱ्या अडचणी मांडल्या. पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्यात 7 ते 8 हजार शेततळी आहेत. 2010 ते 14 या काळात आपण मंत्रीपदी असताना एका-एका दिवसामध्ये हजारोंच्या संख्येने शेततळ्यांना मंजुरी दिली आहे.
रोजगार हमी योजना खात्याचे मंत्रीपद माझ्याकडे असताना त्या योजनेतून शेततळे उभारणीसाठी धोरणात बदल केले आहे. यावेळी रामनाना शिंदे व भारत शिंदे यांनी पाटील यांचे स्वागत केले. यावेळी नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, संचालक मंडळ, शेतकरी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्र्यांकडून अडचणी सोडवणार
द्राक्ष व इतर फळांच्या निर्यातीतून शेतकऱ्यांना अधिक लाभ व्हावा, यासाठी निर्यात अनुदान, वाहतूक अनुदान वाढविणे, जीएसटीत बदल करणे आदी अडचणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मांडून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.