उरुळी कांचन – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत तीन वाहनांचा झालेल्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 17) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. विकास सुरेंद्र (वय 35, रा. रायपूर, छत्तीसगड) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. तर अपघातात दोन कंटेनर व एक चारचाकी गाडी तीनही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पुणे – सोलापूर महामार्गावर एलाईट चौक व तळवडी चौक या दोन्ही चौकांच्या मध्ये एक कंटेनर हा बिघाड झाल्याने मध्यरात्री थांबला होता. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास विकास सुरेंद्र हा कंटेनर घेऊन पुण्याच्या बाजूने निघाला असताना महामार्गावर थांबलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातात कंटेनरचा पुढील भाग हा चक्काचूर झाला होता.
या धडकेत कंटेनर हा दुभाजकावरून सोलापूरच्या बाजूला जाणाऱ्या रस्त्यावर आला. त्याचवेळी सोलापूरच्या दिशेने उभ्या असलेल्या एका चारचाकी गाडीला जाऊन हा कंटेनर धडकला. यामध्ये कंटेनरचा चालक विकास सुरेंद्र हा निपचित पडल्याचे दिसून आला. घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी तात्काळ उपचारासाठी उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांकडून मदत मिळाली असती तर…
पाच मिनिटांच्या अंतरावर लोणी काळभोर पोलीस ठाणे अंतर्गत उरुळी कांचन पोलीस दुरक्षेत्र असून तरीही पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी न नसल्याने तब्बल अर्धा तास या अपघात ग्रस्तांना मदत मिळाली नाही. त्यामुळे अपघात झालेल्या ठिकाणी वाहने व वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे पोलिसांकडून तत्काळ मदत मिळाली नसल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.