रांजणी -लहरी हवामानामुळे घटत चाललेले उत्पादन तसेच प्रतवारीवर पर्याय काढण्यासाठी भविष्यात मल्चिंग पेपरवर कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. मल्चिंग अंथरण्यासाठी एकरी साधारणपणे 15 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.
मल्चिंग पेपरमुळे खुरपणी, तणनाशके तसेच खत औषधे याच्यावर होणारा वारेमाप खर्चावर मर्यादा येऊन जमिनिची सुपिकता वाढण्यास मदत होईल. पाट, वरंबे नसल्याने तेथील जागेत अतिरिक्त उत्पादन निघते. एक कांदा सरासरी 80 ते 100 ग्रॅमपर्यंत निघतो तसेच एकसमान लागवडीमुळे कांद्याचा आकार देखील एकसमान आणि चांगल्या प्रतीचा मिळून उत्पादनात वाढ होईल, असा विश्वास मल्चिंगपेपरवर कांदा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला आहे.
या लागवडीमुळे थंडी, तापमान वाढ, धुके या वातावरणाचा परिणाम 30 टक्क्यांपर्यंत कमी होतो. पाट पाणी नसल्यामुळे जमीन भुसभुशीत राहते त्यामुळे मुळांची आणि कांद्याची देखील वाढ चांगली होते व तनाचे प्रमाण सुद्धा अल्प राहुन खुरपणी खर्च वाचेल. त्याचप्रमाणे मल्चिंगच्या प्रतिकारक किरणांमुळे रस शोषणाऱ्या किडी पिकाकडे फिरकत सुद्धा नाहीत तसेच माती आणि पानांचा संबंध न आल्यामुळे बुरशीचा देखील धोका संभवत नाही.
गेल्या काही वर्षात रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनी नापीक होत चालल्या आहेत; मात्र योग्य नियोजन आणि चांगल्या प्रतीचे नियोजन केल्यास निश्चित मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळू शकते. जवळे येथील शेतकरी अंकुश गायकवाड या शेतकऱ्याने मल्चिंग पेपरचा वापर करून सुमारे आठ एकर क्षेत्रात कांद्याचे आधुनिक पद्धतीने लागवड केली आहे. मल्चिंग पेपरमुळे किडीचा प्रादुर्भाव होत तर नाहीच; परंतु बुरशीचा देखील धोका संभवत नसल्याने मल्चिंग पेपरच्या माध्यमातून या शेतकऱ्याने कांदा उत्पादन घेण्याचे ठरविले आहे.