जांबूत -पिंपरखेड (ता. शिरूर) येथे सलग पाचव्या दिवशी विकास बोंबे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात तिसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट हल्ल्यांची वाढती संख्या लक्षात घेत वनविभागाने ऍक्शन मोडवर येत तातडीने पिंजरे लावून बोंबेमळा (कुऱ्हाडेवस्ती) येथे बिबट्यास जेरबंद केले आहे.
शिरूरच्या बेट भागात बिबट्याने धुमाकूळ घालून केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनांनी सहा महिन्यांत बेट भाग हादरून गेला होता. सातत्याने होणाऱ्या पशुधनावरील व नागरिकांवरील हल्ल्यांवर या भागातील शेतकरी व नागरिकांनी संबंधित प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त करून जांबूत येथील सचिन जोरी, पूजा नरवडे यांच्या मृत्यूवेळी गावच्या चौकात अंत्यसंस्कार करण्याचा आक्रमक पवित्र घेतला होता.
पिंपरखेड येथे मागील आठवड्यात पूजा जाधव या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिकांनी वनविभागाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. वाढत्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेत वनविभागाकडून संबंधित बिबट्या प्रवण क्षेत्रात तातडीने पिंजरे लावत पाच दिवसांत तीन बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बुधवारी पहाटे दुसरा, तर गुरुवारी आठ ते नऊ वर्षांचा तिसरा नर बिबट्या जेरबंद झाल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला;
मात्र पूजा जाधव यांच्यावरील हल्ल्यातील नरभक्षक बिबट्या नेमका कोणता? तो नरभक्षक बिबट्या कधी जेरबंद होणार? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. तीनही बिबट्यांची माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात रवानगी केली आहे. लवकरच तपासणी अहवाल प्राप्त करून नरभक्षक बिबट्याबाबत गावातील ग्रामस्थांना माहिती देण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.
बिबट्या जेरबंद करण्याकामी वनविभागाला विकास बोंबे, ओंकार कुऱ्हाडे, नरेंद्र बोंबे, प्रभू ढोमे, वसंत बोंबे, काळूराम गावशेते, अजित बोऱ्हाडे, काशिनाथ टाकळकर, सर्वेश बोंबे, चिंतामणी कुऱ्हाडे, संतोष गावशेते आदींनी सहकार्य केले. वनविभागाच्या माध्यमातून वन कर्मचारी महेंद्र दाते, लहू केसकर व सहकारी पिंजऱ्यांना रात्रंदिवस पहारा देत आहेत.