पुणे – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे निपुण भारत अभियानांतर्गत राज्यातील इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या आकलनाचे सर्वेक्षण 22 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षकांमार्फतच हे सर्वेक्षण करण्यात येईल. प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्तानिहाय, विषयनिहाय आकलन किती झाले हे पडताळणे, शिक्षकांनी उपचारात्मक अध्यापन करणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. सर्वेक्षण चाचणीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वतंत्रपणे मौखिक स्वरुपात, आवश्यकतेनुसार लेखी पद्धतीने सर्वेक्षण होईल. यासाठी राज्यातील सर्व शिक्षकांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे यू ट्यूब लाइव्ह सत्र घेण्यात आले होते. यावेळी महादेव वांडरे, डॉ. राजेश बनकर, डॉ. रत्नप्रभा भालेराव, वृषाली गायकवाड, डॉ. अरुण संगोलकर, तोसिफ परवेझ, तेजस्विनी आळवेकर, डॉ. ज्योती राजपूत यांनी सादरीकरण केले. यावेळी संचालक राजेश पाटील, सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक विकास गरड, डॉ. कमलादेवी आवटे, अभिनव भोसले आदी उपस्थित होते. प्रश्नाला विद्यार्थ्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादानुसार प्रगत (3), प्रवीण (2), प्रगतशील (1) आणि प्रारंभिक (0) अशी श्रेणी विद्यार्थ्याला देण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांना सूचना शिक्षण विभागातील अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी, विषय सहायक यांनी शाळांना भेटी देऊन प्रातिनिधिक स्वरुपात काही विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्याची माहिती उपलब्ध प्रपत्रात भरून ठेवावी, अशी सूचना देण्यात आली आहे. ही माहिती पुढील सूचना आल्यावर राज्यस्तरावर उपलब्ध करून देण्याबाबत देखील निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे प्रातिनिधिक स्वरूपातील विद्यार्थ्यांची माहिती राज्यस्तरावर देखील उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.