मंगेश रत्नाकर
नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील नारायणगाव ग्रामपंचायतीची मुदत लवकरच संपणार असल्याने निवडणूक जरी जाहीर झालेली नसली तरी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व संभाव्य उमेदवार निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. सामाजिक उपक्रम राबविणे, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे, लग्न समारंभ, वाढदिवस व दशक्रियांना उपस्थित राहून संभाव्य उमेदवार आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे.
नेहमी राज्याच्या राजकीय राजकारणाचा परिणाम ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व विधानसभा निवडणुकांवर होत असतो. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, कॉंग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना तर सत्ताधारी एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना व भाजप यासारख्या प्रमुख पक्षांचा पुढील प्रत्येक निवडणुकीवर प्रभाव दिसून येईल.
सध्या तरी नारायणगावात राष्ट्रवादीचे आमदार आमदार निधीतून, सरपंच उद्धव ठाकरेंची शिवसेना गटातील असल्याने वेगवेगळे फंड व वित्त आयोगातून, भाजपाचे कार्यकर्ते जिल्हा परिषदेच्या फंडातून समाजोपयोगी विकास कामांचे भूमिपूजन करीत आहे. कामांच्या उद्घाटनाची जणू स्पर्धाच लागली असल्याचे दिसून येते. त्यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत नेमकी कोणत्या पक्षाला विकासकामांचा फायदा होईल हे प्रत्यक्ष वेळ आल्यावर मतदार दाखवून देतील यात शंका नाही.
भूमिपूजनाचा सपाटा
नारायणगाव ग्रामपंचायतीची मुदत संपत आल्याने सत्ताधारी शिवसेना गटाकडून वेगवेगळ्या निधी अंतर्गत लोकोपयोगी कामांचे भूमिपूजन केले जात आहे तर सत्ताधारी आमदार गटाकडून आमदार निधीच्या माध्यमातून भूमिपूजनाचा सपाटा लावला आहे.
शिवसेना फुटीचा फटका बसणार?
तालुक्यात शिवसेनेची ताकद तशी जास्तच होती; परंतु उद्धव ठाकरेंची शिवसेना व बाळासाहेबांची शिवसेना असे दोन गट निर्माण झाल्याने त्याचा ग्रामपंचायत निवडणुकीत काय परिणाम होतो हे बघावे लागेल. स्थानिक पातळीवरचा विचार करता नारायणगाव ग्रामपंचायतीत उद्धव ठाकरे शिवसेना गटाची सत्ता आहे. पाच वर्षांच्या कारकीर्दीत सरपंचांनी केलेली विकासाची कामे, दांडगा लोकसंपर्क, क्रीडा, शिबिरे, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, सुखदुःखात सहभागी होणे, व सर्वसामान्यांना आपला हक्काचा माणूस वाटावा, अशी प्रतिमा निर्माण केल्याने उमेदवाराला ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवण्यासाठी ऊर्जा मिळणार आहे.
दुरंगी लढतीची शक्यता
दुसरीकडे ग्रामपंचायतीत शिवसेनेची सत्ता जरी असली तरी आमदारकी राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांनीही स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी पक्षाचे जाळे विणले आहे. गरजेनुसार आमदार निधीतून किंवा फंडातून रस्त्यांची विविध विकासाची कामे केली आहे. आमदार वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहून जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. राष्ट्रवादीने ग्रामपंचायत निवडणुकांसाठी दंड जरी थोपटले असले तरी ग्रामपंचायत उमेदवाराला यश मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल. त्यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना गट व राष्ट्रवादी यांच्यात सरपंचपदाचा सामना पाहायला मिळेल.
नशीब अजमावण्याची संधी…
ज्या पक्षांच्या ताब्यात ग्रामपंचायत आहेत त्या पक्षाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यश मिळवणे सोपे जाते असे म्हटले जाते. असे असले तरी जिल्हा परिषद गटात वेगवेगळ्या पक्षांची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश असल्याने उमेदवाराला सहजासहजी निवडणुकीचा अंदाज येणे सोपे नाही. शिवसेनेचे दोन गट निर्माण झाल्याने शिवसेना उमेदवारांच्या मतांचे विभाजन झाले तर नवल वाटायला नको. राजकारणात अचानक झालेल्या बदलामुळे अनेकांना नशीब आजमावण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला डोळ्यात तेल घालून व्यूहरचना करावी लागेल.