रांजणी -आंबेगाव तालुक्यातील निवडणुकीत तालुक्यात राष्ट्रवादीचाच बोलबाला दिसून आला. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटाच्या मतदानाच्या दुफळीचा फायदा राष्ट्रवादीला झाला. त्यामुळे शिंदे आणि उद्धव ठाकरे गट या शिवसेनेच्या दोन्ही गटांना तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावकारभारी ताब्यात ठेवण्यात अपयश आले.
आंबेगाव तालुक्यात एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील या दोन्ही नेत्यांभोवती तालुक्याचे राजकारण चालत आले आहे. यावेळी मात्र तालुक्यात शिवसेनेचे दोन गट पडल्याने आढळराव पाटील यांना शह देण्यासाठीच शिवसेनेचाच दुसरा गट सक्रिय झाला आहे,
त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादीप्रमाणे भाजप, एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे राजकीय चित्र पाहायला मिळाले. कळंब ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचा लोकनियुक्त सरपंच निवडून आला, तर राष्ट्रवादी, भाजप आणि एकनाथ शिंदे गट अशी निवडणूक झालेल्या चांडोली बुद्रुकच्या सरपंचपदाचा एकनाथ शिंदे गटाला धक्का बसला.
सालवर दोन पक्षांचा दावा
दरम्यान तालुक्यात भाजप देखील आपले पाय हळूहळू रोवू लागला आहे. साल ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आली असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे, तर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील साल ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात असल्याचे म्हटले आहे. या निवडणुकीत तालुक्यात 21 ग्रामपंचायत सदस्य भाजपचे निवडून आल्याचा दावा तालुका अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांनी केला आहे.