जळोची -मद्यधुंद अवस्थेतील चार ते पाच जणांनी दोन दुचाकीवरुन हातात कोयते घेत शनिवार (दि.17) शहरातील पाचहून अधिक हॉटेलमध्ये धुमाकूळ घातला. अनेक हॉटेलचे त्यांनी काचा फोडून नुकसान केले आहे. काही दुचाकींचेही नुकसान केले आहे. त्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
संध्याकाळी सातच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील रेल्वे गेटनजीक एकाचा मोबाइल हिसकावत एका दुकानाची मोडतोड केली, तेथून पाटस रस्त्यावरील सराफ पेट्रोलपंपावर पेट्रोल टाकून पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला. मात्र, त्याने तो चुकविल्याने पेट्रोल भरण्यास आलेल्या एका व्यक्तीला कोयता लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
त्यानंतर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयासमोरील दुकान व हॉटेलमध्ये घुसून भांडणे करीत मोडतोड केली, चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या, या शिवाय एकावर हल्ला केल्यानंतर त्याच्या हाताला कोयत्याची दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर दुचाकीवरुन हातात कोयते दाखवत शहरभर हे युवक फिरत होते.
काही दुकानांच्या सीसीटीव्हीत हे दृश्य कैद झाल्याचेही समजते. घटनेनंतर पोलिसांनी हालचाल करीत दोन युवकांना जेरबंद केले. त्यांनी कुठे कुठे काय नुकसान केलेले आहे याची माहिती पोलीस घेत होते. मात्र, पुन्हा एकदा सुरक्षितेताच प्रश्न ऐरणीवर आला आहे.
निरपराध नागरिकांना विनाकारण हल्ल्याला सामोरे जावे लागणार असेल तर करायचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक इंदापूरला असल्याने सर्वच प्रमुख वरिष्ठ अधिकारीही इंदापूरला असल्याचे पोलिसांनी सांगितले.