पारगाव शिंगवे -ऊसतोडी मजुरांच्या झोपड्यांना लागलेल्या आगीत तीन झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत ऊसतोडणी मजुरांच्या संसार उपयोगी वस्तू धान्य, कपडे जळून खाक झाले. अंदाजे 1 लाख रुपयांचे नुुुकसान झाले; सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली. ही घटना पारगाव येथील भीमाशंकर साखर कारखाना येथे एक वाजण्याच्या सुमारास घडली आगीचे कारण समजू शकले नाही.
याबाबत माहिती अशी भीमाशंकर साखर कारखान्याच्या बाजूला चिचगाई वस्ती जवळ आनशाबा खंडू चितळकर, अर्जुन नवनाथ क्षीरसागर, तसेच किसन आनशाबा चितळकर (मूळ रा. पाथर्डी) या मजुरांचय झोपड्या आहेत. आज सकाळी हे मजूर ऊस तोडण्यासाठी शेतात गेले होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास या तीन झोपड्यांना आग लागली. पाचटामुळे आगीने उग्ररूप धारण केल्यामुळे तीनही झोपड्या जळून खाक झाल्या.
या आगीत आनशाबा चितळकर यांचे 6 पोती धान्य, कपडे, टीव्ही, संसार उपयोगी वस्तू, जनावरांचे खाद्य जळून खाक झाले. त्यांचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच अर्जुन क्षीरसागर यांचे धान्य, कपडे, संसार उपयोगी वस्तू जळून जाऊन 30 हजाराचे तर किसन चितळकर यांच्या धान्य, कपडे, वस्तू जळून जाऊन 30 हजार रुपयांचे नुकसान झाले.
या घटनेचा पंचनामा गावकामगार तलाठी विकास खोटे यांनी केला आहे. भीमाशंकर कारखान्याने पाण्याचा टॅंकर पाठवल्याने आग नियंत्रणात आली. आग विझवण्यास संतोष वाव्हळ, संतोष वाघमारे व नामदेव खरात, जेसीबी ऑपरेटर निलेश खुडे यांनी प्रयत्न केले.
कारखान्याकडून मदत
भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील व कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांच्या सूचनानुसार ऊस तोडी मजुरांना तातडीने कपडे तसेच आठ दिवस पुरेल एवढा किराणा देण्यात आला. याचे वाटप कारखान्याचे संचालक माऊली आस्वारे रामहरी पोंदे व मुख्य शेती अधिकारी दिलीप कुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे, ऊस विकास अधिकारी सोमेश्वर दीक्षित, गटप्रमुख किरण गरुड, संतोष थोरात, विजय सटाले, आदी उपस्थित होते.