आळंदी – महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले संतभुमी अलंकापुरी नगरीत “एक दिवस धर्माच्या रक्षणासाठी’ विराट हिंदू जनगर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अलंकापुरी नगरीत गेल्या काही दिवसांपुर्वी हिंदू समाजातील नागरिकांचे धर्मांतर ख्रिश्चन मिशनरी करत असताना उघड झाले आहे. भविष्यात संतभुमी अलंकापुरी नगरी एखादी व्हॅटिकन सिटी म्हणून उभी राहिला वेळ लागणार नाही ही धर्मांतराची कीड रोखण्यासाठी हिंदुस्थानात आणि महाराष्ट्रात धर्मांतर बंदीचा कायदा लागू झाला पाहिजे आणि हा कायदा व्हावा हे समाजातील सर्व घटकांना वाटत आहे,
त्याला वाचा फोडण्यासाठी ती हाक सरकारच्या कानावर घालण्यासाठी संतभूमी अलंकापुरी नगरीत विराट हिंदू जनगर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू जनजागरण मोर्चाची सुरुवात चाकण रोडवरील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था येथून झाली. हा मोर्चा ज्ञानेश्वर विद्यालय रस्त्यावरून चाकण, मनकर्णिका चौक, प्रदक्षिणा रोड, भैरवनाथ चौक, पाण्याची टाकी, कॉसमॉस बॅंक, पोलीस स्टेशन, नगरपरिषद चौक मार्गे महाद्वार चौकात मोर्चाची सांगता झाली.
यावेळी आळंदी शहरातील वारकरी शिक्षण घेणाऱ्या साधक आणि महाराज मंडळींची लक्षणीय उपस्थिती होती. मोर्चामध्ये आळंदी आणि पंचक्रोशीतील सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. जय श्रीराम, संत ज्ञानेश्वरमहाराज व संत तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज की जय, सनातन हिंदु धर्म की जय, भारतमाता की जय, आळंदीचे पावित्र्य राखलेच पाहिजे, धर्मांतर विरोधी कायदा झालाच पाहिज, अशा घोषणा देण्यात आल्या. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत विशेष पोलीस बंदोबस्त आळंदीमध्ये ठेवण्यात आला होता.