-प्रफुल्ल बोंबे
जांबूत – राज्यात विजेच्या प्रश्नासंदर्भात अनेक घडामोडी घडत असताना ग्राहकांचे चुकीच्या पद्धतीने रिडिंग घेत अथवा अंदाजे केली जाणारी रिडिंग व अवाजवी बिलांची आकारणी महावितरणकडून होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. कंत्राटी पद्धतीने विजेच्या मीटरचे रिडिंग आकारणी करण्यासाठी अनेक कर्मचारी नियुक्त केलेले आहेत, मात्र, प्रत्यक्षदर्शी जाऊन रिडिंग न घेता आणि विजेचा वापर न करता देखील अनेक शेतकऱ्यांना महावितरणकडून अवाजवी बिले आकारली जात आहे.महावितरणकडून अशा प्रकारे वारंवार झालेल्या चूक दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना महावितरण कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
महावितरण विभागाने यापुढील काळात सूचनांची अंमलबजावणी करीत प्रत्यक्षदर्शी थेट ग्राहकांचे मीटरपर्यंत पोहचून वीजबिल आकारणी करावी, चुकीच्या व थकीत वीजबिलासंदर्भातील प्रश्न तातडीने सुटले नाही, तर महावितरणसमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा पिंपरखेड भाजपचे अध्यक्ष रवींद्र बोंबे यांनी दिला आहे.
अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात असून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारभाव नाही. अशातच बळीराजा मेटाकुटीला आला असताना चुकीच्या पद्धतीने येणारी भरमसाठ बिले कुठून भरायची, असा प्रश्न आज सर्वसामान्य जनतेसमोर असल्याचे दिसून येत आहे. चुकीच्या पद्धतीने विजेचा वापर करणाऱ्या उद्योग व्यवसायांना महावितरण पाठीशी घालते, मात्र, प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना अवाजवी बिलांमुळे शासनदरबारी हेलपाटे मारावे लागत आहे. संबंधित वीजबिले कमी करण्यासाठी अन्यथा रोहित्रांचे इतर कामासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर सर्वसामान्यांना तुच्छतेची वागणूक देत आहेत.
सर्वसामान्यांची गळचेपी
अनेक ग्राहकांना महावितरण विभागाचे नियमावलीची माहिती नसल्याने आलेल्या थकीत बिलांचा आर्थिक भार सोसावा लागत आहे. वेळेवर रीडिंग आकारणी न झाल्यास संबंधित मर्यादेच्या बाहेर रीडिंग गेल्यास ठरवून दिलेल्या वेगळ्या रकमेची युनिट आकारणी होत आहे. महावितरणच्या चुकीच्या पद्धतीमुळे अनेक ग्राहक यामध्ये भरडले जात आहेत. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी गावागावांत नियमावलीच्या बाबतीत जनजागृती करून शेतकरी व ग्राहकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.
लाइनमन, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार
जांबूत परिसरात काम करणारे लाईनमन व स्थानिक कर्मचारी हे महत्वाची कामे बाजूला ठेऊन अनकेदा रिडींग आकारणी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे, मग नियुक्त केलेले कर्मचारी वेळेवर आकारणी का करीत नाहीत, असा प्रश्न वाढीव वीजबिल आकारणीला कारणीभूत ठरत आहेत. अनेक ठिकाणी विजेच्या तारांमध्ये पडलेला झोळ,
वाकलेले विद्युत खांब, जीर्ण झालेल्या विद्युत वाहिनी, नादुरुस्त आणि उघड्या स्वरूपातील फ्युज पेट्या याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न प्रलंबित असून महावितरण मात्र झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहेत.